मुंबई-महायुतीचा एक जबाबदार नेता म्हणून मी सांगतो की, आमच्या युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहणार आहेत. कोणीही कितीही दावा केला, भाकित सांगितली तरी त्याला काहीही महत्त्व नाही. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आहेत. याची जाणीव भाजप म्हणून मला आणि राष्ट्रवादी म्हणून अजित दादांना पूर्णपणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीबदलाबाबत सर्व चर्चा खोट्या आहेत. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला.
महायुतीतील कोणत्याही नेत्यांच्या मनात कोणत्याही पदाबाबत संभ्रम अजिबात नाही. त्यामुळे कार्यकर्ते अथवा कोणी मंत्र्यांनी बोलताना संभ्रम निर्माण होतील असे विधानं करू नये, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, असे वाटणे अजिबात गैर नाही. पण बोलताना वास्तवाचा भान ठेवले पाहिजे, असे त्यांना माझे सांगणे आहे. असे म्हणत फडणवीसांनी मंत्री अनिल पाटील यांना खडसावले.
कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केले की, 10 ऑगस्टनंतर मुख्यमंत्री अजित पवार होणार आहेत. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मी महायुतीतील एक जबाबदार नेता म्हणून सांगतो की, काही लोक आजकाल राजकीय भाकित करण्याचे काम करित आहे. 10 ऑगस्टला काहीही होणार नाही. ९ तारखेला नाही तर ११ तारखेला देखील काहीच होणार नाही. झालेच काही तर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पण त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्या तारखेची निश्चित केली तेव्हाच होईल.
महायुतीतील सर्व नेत्यांमध्ये आमच्या जबाबदाऱ्या, आमची पद याची स्पष्टता आहे. मुख्यमंत्रीबदलाबाबत कधीही काहीही होणार नाही. हे अगदी मी ठामपणे व जबाबदारीने सांगत आहे. त्यामुळे पतंगबाजी करून चर्चांना उधाण करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही.