मुंबई-खते आणि बोगस बियाणांच्या मुद्यांवरुन आज विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आदींनी राज्याच्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांची केंद्राकडून होणाऱ्या लुटीच्या संदर्भात विधिमंडळात उत्तरे देताना कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या तोंडाला फेस आला ..अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या बचावासाठी उभे राहीले आणि विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
आज विधानसभेत बोगस बियाणे विक्रीप्रकरणी किती जणांवर कारवाई झाली, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी केला. बोगस बियाणे प्रकरणी राज्यभरात हप्तेखोरांच्या टोळ्या फिरत आहे, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. खतांमध्ये केंद्र सरकारकडून नफेखोरी होत असल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला.
बोगस बियाणांच्या संदर्भात अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक होते हे मी मान्य करतो. बोगस बियाणांच्या संदर्भात यापूर्वी 1966 चा बीटी कॉटनचा कायदा आहे. तरीही हे प्रकार थांबत नसल्यामुळे आपण आता त्यासाठी आणखी कडक कायदे आणत आहोत. 1966 च्या कायद्यात असा गुन्हा केला तर 500 रुपयांचा दंड आहे. दुसऱ्यांदा गुन्हा केला तर एक हजार रुपयांचा दंड आणि त्यानंतरही गुन्हा केला तर परवाना रद्द अशी तुटपुंजी तरतुद आहे. त्यामुळे हा कायदा आणखी कडक करण्यासाठी सरकारने समिती गठीत केली आहे. बीटी कॉटनप्रमाणे बोगस बियाणे विक्रीप्रकरणी कारवाई केली जाईल. आम्ही सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचेही मुंडे म्हणाले.
आतापर्यंत राज्य सरकारने बोगस बियाणे व खते विक्रीप्रकरणी किती जणांवर कारवाई केली, असा प्रश्न काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला. मात्र, धनंजय मुंडे यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कंपन्यांना नोटीस पाठवली जात आहे, अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला. त्यावर स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी धनंजय मुंडेंना मधेच रोखत विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरे द्या, असे धनंजय मुंडेंना सांगितले. मात्र, धनंजय मुंडे समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्यामुळे अखेर त्यांनी सभात्याग केला.
विरोधकांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या प्रश्नांची सरबत्ती पाहून भाजप नेते आशिष शेलार उभे राहीले. तसेच, आधी विरोधी पक्षनेता ठरवा, म्हणजे तुमचा गदारोळ कमी होईल, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला. यावर तुम्ही केवळ तुमचा प्रश्न विचारा, अनावश्यक चर्चा करू नका, अशी समज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. यानंतर अशोक चव्हाणांनीही आशिष शेलारांना चांगलेच खडसावले. आम्ही मंत्र्यांना प्रश्न विचारत असताना आशिष शेलारांना मधेच बोलण्याची गरजच काय? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. त्यानंतर आशिष शेलार शांत झाले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारने यावर्षी खताच्या किमती मर्यादित रहाव्यात यासाठी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना बोगस बियाणे व खते विक्री संदर्भात कारवाई सुरू केली आहे. १६४ मेट्रीक टन साठा बियाणांचा जप्त केला आहे. २२ पोलिस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.