अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळा
पुणे : आम्ही भारतीय आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. भारत देश हा घटनेप्रमाणे चालला पाहिजे. मुलगी-मुलगा हे सारखेच असे आपण म्हणतो. मात्र, घरामध्ये त्यांच्यात भेदभाव करुन विषमता सुरु होते. देशात देखील जोरात भांडण सुरु आहे. सध्याची नवी राजवट ही काळजी करण्यासारखी आहे. त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, अॅड.सुषमा अंधारे, बाळासाहेब अमराळे, वैशाली गाडगीळ, पराग गाडगीळ, अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, सपना लालचंदानी, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.
यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक सौरभ गाडगीळ, उद्योग भूषण पुरस्कार युवराज ढमाले कॉर्प चे संचालक युवराज ढमाले, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार, धार्मिक भूषण पुरस्कार श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट शिरगाव चे प्रमुख विश्वस्त प्रकाश देवळे आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,फळांची करंडी, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
अॅड. सुषमा अंधारे म्हणाल्या, कुटुंबाला उभे करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो. प्रत्येक महिला आपल्या कुटुंबासाठी उर्जेचा स्त्रोत असते. मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले नाही. इच्छा असेल तर प्रतिकूलतेवर मात करता येते आणि आपण राजकारणासह कोणत्याही क्षेत्रात यशस्वीपणे काम करु शकतो.
पुरस्काराला उत्तर देताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, कला क्षेत्र म्हणजे ग्लॅमर, पैसा या गोष्टी दिसतात. मात्र, त्यामागे मोठे कष्ट असतात. घरातील परिस्थिती, आलेली संकटे यांना तोंड देत आम्ही रसिकांचे मनोरंजन करीत असतो. जेव्हा रसिकांची कौतुकाची थाप पडते, तेव्हा कलाकारामधील उत्साह व उमेद वाढते, असेही त्यांनी सांगितले. रामदास फुटाणे यांनी मनोगत व्यक्त केले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.