श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित कीर्तनमालेला प्रारंभ
पुणे : आपल्या प्रवृत्तीची गंगा सागरामध्ये जावून स्थिर होते. खरे तर, भक्ती आणि प्रेमरुपी सागरामध्ये स्थिर होत असते. वारकरी संप्रदाय किंवा भागवत धर्म हा पचायला खूप अवघड आहे. ज्या वेळेला आपली दृष्टी विठ्ठलाने भरेल, त्यावेळी आपल्याला काहीच कमी वाटणार नाही. सर्व साधने जिथे खुंटून जातात, तिथे भक्ती व प्रेमाचा उदय होतो, असे ह.भ.प.भगवती ताई सातारकर- दांडेकर यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ ट्रस्टतर्फे हा कार्यक्रम सुरु आहे. कीर्तनमालेत ह.भ.प.भगवती ताई सातारकर- दांडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भगवती ताई सातारकर – दांडेकर म्हणाल्या, ईश्वरी सत्तेची प्रतिती संतांना दिसली. संतांना ज्या प्रतितीमध्ये परमेश्वर दिसला, त्यामध्ये विरुन जाणे हे आपले काम आहे. परमेश्वराचे नाम घेतल्याशिवाय विश्वात असलेले ज्ञान, भक्ती, आनंद सामान्यांना मिळणार नाही. नाम हे अमृत आहे, त्यामुळे आपण नामस्मरण करायला हवे.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, गणेश कला क्रीडा मंच येथे दिनांक १९ जुलै पर्यंत दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सव असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. कीर्तन महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.