पुणे-बारामती लोकसभा मतदार संघातील आणि पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या काही गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. या गावांत पुन्हा गुरुवारी पाणी बंद ठेवले अजून विस्कळीतपणा येतो. त्यामुळे अशा गावांत गुरुवारी पाणी बंद ठेऊ नये. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.
खासदार सुळे यांच्या पत्रानुसार बारामती लोकसभा मतदार संघातील पुणे महानगर पालिकेत समाविष्ट गावांना दिवसाआड आणि अनियमित पाणी पुरवठा होतो. तसेच नव्याने समाविष्ट धायरी, न-हे, नांदोशी सणसनगर या गावात विभागानुसार फक्त अर्धातास ते एक तास ऐवढाच पाणी पुरवठा केला जातो. त्यातच काही ठिकाणी महावितरणकडून त्या परिसरातील लाईट गेली तर त्या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सद्य स्थितीत अनेक सोसायटयांमध्ये व गावांमध्ये असलेल्या पाण्याच्या कुपनलिका उन्हाळ्यामुळे बंदा पडलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच नागरीक पाणी समस्यांमुळे हैराण आहेत. सुळे यांनी म्हटले आहे कि, जर पुणे महानगर पालिकेने दिवसाआड पाणी देणा-या गावामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला तर त्या परिसरामध्ये पाण्यासाठी नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या गावात दिवसाआड पाणी पुरवठा आहे त्या ठिकाणचे पाणी आहे त्या प्रमाणे चालू ठेवावे. त्या मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू नये. अशी मागणी सुळे यांनी केली आहे.