सातारा – भाजपला हुकूमशाही प्रस्थापित करायची असल्याचे मी सांगत आलो आहे. अमित शहा यांनी अनेकदा काँग्रेसमुक्त भारत म्हणणे म्हणजे त्यांना विरोधी पक्षच नको आहे. छोटे पक्षही नको आहेत. केवळ भाजपचेच सरकार आणि हुकूमशाही हवी आहे. त्यामुळे देशाला हुकुमशाहीच्या दिशेने नेले जात आहे. हे होऊन द्यायचे की नाही ते लोकांच्याच हातात आहे.असे सांगत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 45 आमदारांमधील 30 किंवा त्याहून अधिक आमदार फुटून बाहेर पडण्याची सूतराम शक्यता नसल्याचा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. भाजपच्या गोटातून अफवा पसरवण्याचे काम सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शिवसेनेबाबत जे घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडले आहे. त्यात नेते सोडून गेले असले तरी जनता जाणार नाही, याचा प्रत्यय लवकरच येईल. पक्षफुटीचे राजकारण मी अनेकदा पाहिलेले आहे. छोट्या-मोठ्या प्रमाणात लोक येतात अन् जातातही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये यापूर्वी विविध पक्षांमधून गेलेले लोक म्हणजे लोकाची गर्दी आहे. या गर्दीमध्ये कोणाला काय पद मिळणार? हा प्रश्नच आहे. राज्य सरकारला साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्तीही रखडलेली आहे. हे सारे वाटते तितके सोपे नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आजची राजकीय स्थिती पाहता सर्वसामान्यांचा स्वतःवरच विश्वास राहिला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगत केवळ नेत्यांनाच दोष देऊन चालणार नाही. त्यांना निवडून कोणी दिले? अमिषांना बळी कोण पडले? हेही पहाणे महत्वाचे असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले.