मुंबई: वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. फडणवीस हे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर रात्री एक वाजून चोवीस मिनीटांनी फडणवीस तेथून बाहेर पडले.राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रीपदाची संधी दिल्यामुळं शिंदे गटातील काही आमदार नाराज झाले आहेत. कारण या मंत्रीमंडळ विस्तारात शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळेत अशी आशा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्रीपदाची संधी देण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगत आहेत. त्याच अनुषंगाने रात्रीच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळं आता पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारत नेमकी कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.मंत्रिमंडळ विस्तारासोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. हीच बाब दोन्ही गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पटवून देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सध्या राज्यात सातत्यानं विविध राजकीय घडामोडी घडत आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत गुवाहाटी गाठली होती. त्यांनतर त्यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यांनी देखील काही आमदारांसह सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजित पवार हे पुन्हा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले तर अन्य राष्ट्रवादीच्या 8 जणांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.