सातारा-रशियाचे हुकुमशहा व्हलादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे भाडोत्री सैन्य ठेवले होते. मात्र, आज तेच सैन्य त्यांच्यावर उलटले आहे. महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट बाळगला आहे. हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत आत मंत्री शंभुराज देसाई यांचा मतदारसंघ असलेल्या पाटण दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, पुतीन हा हुकुमशहा आहे. त्याने भाडोत्री सैन्य नेमले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्यच राज्य करत आहे. भाजपने हे सैन्य ठेवले आहे. हे असे भाडोत्री कुणाचेही नसतात. हे बाजार बुणगे आहेत. एक दिवस ते भाजपलाच खतम केल्याशिवाय राहणार नाही.
नुकत्याच झालेल्या पाटणा येथे विरोधकांच्या बैठकीवर भाजप नेत्यांनी सडकून टीका केली आहे. देशबचावसाठी नव्हे तर कुटुंब बचावसाठी हे नेते एकत्र आले, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, बैठकीसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजुला बसल्यानेही उद्धव ठाकरे कुणाशीही तडजोड करू शकता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले की, आम्ही स्वार्थासाठी एकत्र आलो. तर भाजप आणि शिंदे गट काय अध्यात्म, परमार्थासाठी एकत्र आला आहे. बाजारबुणग्यांसोबत सत्ता स्थापून भाजप कोणता परमार्थ साधत आहे.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यावरही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले, सातारा जिल्ह्यात मी म्हणजे सर्वस्व. मी म्हणजे मालक अशी शंभुराज देसाई यांची भाषा आहे. मात्र, मी म्हणजे मालक हे दिल्लीत चालत नाही, तर महाराष्ट्रात काय चालणार? शंभुराज देसाई यांचे आजोबा बाळासाहेब देसाई यांना जनेतेनेच लोकनेते ही पदवी दिली होती. जनता त्यांना लोकनेता का म्हणायचे, याचा अभ्यास शंभुराज देसाई यांनी केला पाहीजे. या देशात लोकशाही आहे. जनताच आपले सत्ताधारी ठरवत असतात आणि पुढील निवडणुकीत तुम्ही पराभूत होणार आहात, असा टोला संजय राऊतांनी शंभुराज देसाईंना लगावला.
संजय राऊत म्हणाले, मी म्हणजे मालक, असे तुम्ही म्हणत असाल तर आमचे तुम्हाला आव्हान आहे की, राज्यात किमान महापालिका निवडणुका घेऊन दाखवा. तेव्हा लोकांच्या भावना काय आहे, हे तुम्हाला कळेल. तुम्ही निवडणुकांना एवढे का घाबरत आहात?