अकोला-वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली. त्यांच्या कृतीने वाईट वाटले, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अकोला येथे जाहीर सभेत यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रकाश आंबेडकरांचे आणि आमचे विचार वेगळे असतील पण प्रकाश आंबेडकरांकडे पाहत असताना आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. हैदराबादच्या निजामाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्यासोबत सामील करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आमिषे दिली. बुद्ध धम्म घेऊ नका, असे निजाम बाबासाहेबांना म्हणत होता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, मी तोच धम्म स्वीकारेन जो भारताच्या भूमित तयार झाला असेल. अशा बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही वशंज आहात. त्यामुळे तुमच्याकडून असे वर्तन अपेक्षित नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही कुठल्याही धर्माचा विरोधात नाही. पण औरंगजेब आमचा नेता, आमचा राजा कसा होऊ शकतो? आमचा राजा एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याशिवाय आमचा दुसरा राजा होऊ शकत नाही. औरंगजेब आणि त्याचे खानदान बाहेरून आले होते. भारतातील मुस्लिमांचा आणि औरंगजेबाचा काहीच संबंध नाही. ते औरंगजेबाचे वंशज नाही. भारतीय मुस्लिम हा राष्ट्रवादी विचारांचा मुस्लिम आहे. ते औरंगजेबाला मानत नाही. भारतातील, या मातीत जन्मलेला मुस्लिम फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच मानतो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या राज्यात काही लोक शांतता नांदू नये म्हणून प्रयत्न करत आहेत. अचानकपणे काही लोक औरंगजेबाचा स्टेटस कसा ठेवू लागले? छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि कोल्हापूरला जे घडल तो योगायोग नाही तर एक प्रयोग आहे. काही लोक जाणीवपूर्वक अशांतता झाली पाहिजे म्हणून प्रयोग करत आहेत. राज्यात एवढ्या औरंग्याच्या औलादी कुठून पैदा झाल्या? त्यांना कुणीतरी पैदा करत आहे. काही लोकांना मळमळ आणि जळजळ होते आहे. असे लोक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.