ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा नोंदल्याचे निमित्त
आगामी लोकसभा व विधानसभा युती एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असली तरी भाजपने विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ मतदारसंघात स्वबळावर लढायची तयारी चालवल्याचे शिंदेसेनेकडून मानले जाते आहे.ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यावर नाेंदलेला गुन्हा आणि मतदारसंघप्रमुखांची नेमणूक अशा कार्नानावरून आणि भाजपा नेते फडणवीस यांच्या सर्वोच्च मी या आतील स्वभावातून राज्यातील सत्ताधारी युतीचे घटक पक्ष भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. त्यात भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे पिता-पुत्रावर बहिष्कार घातल्याच्या बातमीने या अंतर्गत धुसफुसीला दुजोरा मिळतो आहे.
मागच्या आठवड्यात राज्यातील २५ ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्या करताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात एकमत झाले नाही. परिणामी शिंदेंनी आपल्या मर्जीप्रमाणे काही बदल्या केल्या.तरीही महसूल आणि नगरविकासच्या बदल्यांमध्ये फडणवीसांनी हस्तक्षेप करत आपल्या मर्जीचे अधिकारी आणले. एमएमआरडीए आयुक्त नेमण्यावरून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणाची भर पडली आहे.
कल्याण या ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत खासदार आहेत. तेथील भाजपचे डोंबिवली पूर्व विभागाचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. हा गुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून आलेल्या दबावामुळे झाल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा आहे. गुन्हा नोंदवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करेपर्यंत कल्याणमध्ये सेनेच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालायचा असा निर्णय भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
प्रदेश भाजपने नुकतेच विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ मतदारसंघात निवडणूकप्रमुख नेमले आहेत. त्यात मागच्या वेळी पराभूत झालेल्या उमेदवारांना नेमण्याची खबरदारी घेतली आहे. म्हणून आगामी निवडणुकांमध्ये शिंदेसेनेच्या मतदारसंघात मोठा पेच निर्माण होणार आहे. शिंदेसेनेच्या वाट्यास येणाऱ्या मतदारसंघात भाजप व सेनेत संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.
ठाणे आणि कल्याण कळीचा मुद्दा
ठाणे मतदारसंंघ शिंदेसेनेने घ्यावा आणि कल्याण आपल्याला मिळावे अशी भाजपची इच्छा आहे. कल्याण मतदारसंघात रा. स्व. संघाचे प्राबल्य आहे. हा मतदारसंघ भाजपच्या राम कापसे यांचा. मात्र आनंद दिघे यांच्या दांडगाईने तो मतदारसंघ प्रमोद महाजन यांनी तत्कालीन शिवसेनेला दिला.ठाणे आणि कल्याण दोन्ही आमच्याच आहेत, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा आहे. या दोन्ही जागा आम्ही सोडणार नाही, अशी शिंदे यांची भूमिका आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील तणावाचा हा कळीचा मुद्दा ठरला आहे.ठाणे मतदारसंघ शिवसेनेने घ्यावा अशी भाजपची इच्छा आहे. येथे सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजन विचारे खासदार आहेत, तर कल्याणमधून खासदार असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांनी ठाण्यातून लढावे असा भाजपचा पर्याय आहे.