मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही धमकी मिळाली आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिस आयुक्तांना भेटून तक्रार दाखल केली. मात्र, अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.’राजकारण महाराष्ट्राचे’ या नावाचा अकाउंट वरून शरद पवार यांना धमकी देण्यात आली आहे. यानंतर या धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्कतांकडे तक्रार दाखल केली. याची तत्काळ दाखल घेत राज्य शासन ॲक्शन मोडमध्ये आले असून पोलिस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीची तक्रार पोलिस आयुक्तांकडे केल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली असून तात्काळ कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान अशा धमक्या खपवून घेणार नसल्याचं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.या धमकी प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी दिल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.