सरकारने काढला जीआर
मुंबई–
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 7 लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. भरउन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मोकळ्या परिसरात सर्व शासकीय कार्यक्रम हे 12 ते 5 या वेळेत न करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर, शेकडो रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नेत्यांनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
14 लोकांचा जीव गेल्यानंतर राज्यसरकारला जाग आली आहे. खारघर येथील दुर्घटनेनंतर कोणत्याही मोकळ्या जागेत 12 ते 5 या वेळेत कार्यक्रम घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती दिली आहे. राज्य सरकारने याबाबत नवा जीआर देखील काढला आहे.
रविवारी 16 एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम सकाळी 10.30 वाजेचा होता. मात्र सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, सचिन धर्माधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमीत शहा आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भाषणे झाली. सूत्र संयोजकांनी मोठा वेळ घेतला. परिणामी हा कार्यक्रम तब्बल 1 वाजता संपला. सेवकांना कार्यक्रम स्थळातून बाहेर पडण्यास तीन ते चार तास लागले. परिणामी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत 7 लाख लोक उन्हात होते. या पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. शेकडो लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत.