पुणे-उत्तरप्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या वादातून टोळक्याने तिघांवर चाकुने वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. या प्रकरणी पाच जणांच्या विरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलामुद्दीन जमील अहमद (वय २१, सध्या रा. एनआयबीएम रस्ता, कोंढवा,पुणे), अमीर आणि अबरार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी शकील खान, कलीम खान यांच्यासह पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कलामुद्दीन अहमदने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कलामुद्दीन आणि आरोपी मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत.दोन वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्यात वाद झाला होता. कलामुद्दीन, अमीर, अबरार कोंढव्यातील भैरवनाथ मंदिर परिसरातून रात्री निघाले होते. त्या वेळी आरोपींनी तिघांवर चाकुने वार केले. तिघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.