ठाणे- “हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नसून काही तासांचे आहे. सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला जे कुणी अधिकारी हुजरेगिरी करत मदत करत आहेत. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. जे लोक सरकारचे चिलटे म्हणून काम करीत आहेत, त्यांना आमची सत्ता आल्यानंतर तुरुंगात टाकले जाईल. ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा कार्यक्रम आम्ही राबवू. हाच निश्चय करण्यासाठी आज आम्ही आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर आलो आहोत.”असा स्पष्ट इशारा आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिला . मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचे बोट धरून मोठे झालेले आज बाळासाहेबांच्या वारसांना संपवायला निघालेत ,त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे धमकावणे असे प्रकार करत ठाकरेंशी गद्दारी करू लागलेत आणि त्यांना साथ काही अधिकारी देऊ लागलेत असा आरोप करत ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असा ठपका ठेऊन करत महाविकास आघाडीच्या वतीने आज ठाण्यात जनक्षोभ मोर्चा काढण्यात आला. तीनही पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला.
“आमच्या मोर्चाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून १७ अटी घालण्यात आलेल्या आहेत. आता महाराष्ट्रात मोर्चा काढायचा नाही, भाषण करायचे नाही? का गद्दार लोकांच्या टोळीने रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्याविरोधात तक्रार करण्यासाठी आमचे नेते पोलीस आयुक्तांकडे गेले असता पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले. फेसबुकवर फक्त एक पोस्ट टाकली म्हणून तुम्ही महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करता. पोलीस मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत, आयुक्त कार्यालयात थांबत नाहीत, कारण ते ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आदेश घेत आहेत. आज अधिकारी जागेवर नाहीत, महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर गुजरात, गुवाहाटीचे मुख्यमंत्री बसले आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.