..तर उत्तम करिअर घडू शकेल -प्रा. डॉ. किरण रणदिवे
पुणे-प्रत्येक विद्यार्थ्यांमधे विशेष गुणवत्ता नक्कीच असते.मात्र स्वत:वर अढळ विश्वास व नैसर्गिक आवड यांच्याआधारे अंगभूत कौशल्याची जोपासना केल्यास उत्तम करिअर घडू शकेल ” असा विश्वास बुरशी वनस्पती क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार विजेते पहिले भारतीय व आंतरराष्ट्रीय बुरशी तज्ञ प्रा. डॉ. किरण रणदिवे यांनी व्यक्त केला.
वंदनीय महामानव सामजिक संस्था व महाराष्ट्र झोपड़पट्टी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेतील ‘ विद्यार्थी करिअर मार्गदर्शन-एक निरंतर उपक्रम या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र झोपड़पट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक भगवान वैराट हे होते या उपक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष चेतन तूपे यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर निलेश मगर, यांच्यासह हड़पसर/ मुंढवा प्रभाग समिति अध्यक्षा हेमलता मगर, नगरसेविका पूजा कोद्रे ,स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय तूपे, निमिर्ती अकादमी चे संचालक सचिन गुळीग, दत्ता कांबळे, गणेश ससाणे, सुनील गोगावले,संतोष खरात, बच्चूसिंग टाक, सुरेखा भालेराव, ईश्वर लोखंडे, विश्वास कांबळे, संस्थेचे संस्थापक बाळासाहेब सुपेकर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
निमिर्ती अकादमी चे संचालक सचिन गुळीग यांनी प्रशासकीय सेवेतील संधी याविषयी सविस्तर माहिती देताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू विद्यार्थी- विद्यार्थिनी साठी प्रशासकीय सेवा क्षेत्रातील विविध स्पर्धा परीक्षांविषयी अभ्यासक्रम व कार्यशाळा मोफत घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वत:मधील कला- कौशल्याच्या आधारे उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक संधी स्विकाराव्यात असे आवाहन निलेश मगर यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष अनिल खरात यांनी प्रस्ताविक केले. सुनील गोगावले, दत्ता कांबळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
”अशा स्वयंसेवी संस्था तळागाळातील होतकरू विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी रचनात्मक उपक्रम राबविणार असतील तर त्यांना विविध शासकीय पातळीवरून मदत मिळवून देण्याकरिता महाराष्ट्र झोपड़पट्टी सुरक्षा दल पुढाकार घेईल असे आश्वासन सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट यांनी यावेळी दिले.”
”साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अमुल्य योगदानाबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारने गौरविण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पुणे शहराच्या वतीने महानगर पालिकेत आग्रही राहून प्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल” असे प्रतिपादन चेतन तूपे यांनी केले.राज्यघटना हा भारतातील नागरिकांचा मानबिंदु असून त्याचा अवमान करणाऱ्याविरोधात संघर्ष केला जाईल असा इशाराही तुपे यांनी दिला.
संस्थेचे उपाध्यक्ष नितिन बोराडे, स्वप्निल रासकर, प्रताप कांबळे, गणेश जाधव, शिवाजी वाव्हूळ, संतोष पठारे,दादा गायकवाड़, दीपक गायकवाड़,सचिन भोरे, महादेव भोवाळ,गणेश घोड़के, बाळासाहेब गायकवाड़, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.