पुणे, २३ ऑक्टोबर: “२१ व्या शतकात भारताला जगामध्ये आध्यात्मिकतेच्या नावाने ओळखले जाणार आहे. उत्तराखंड येथील माणा गावात श्री सरस्वती मातेच्या मंदिराची निर्मिती केल्याने येथे दर्शनसाठी जगभरातील भक्तमंडळी येतील. यातूनच या गावाची अर्थव्यवस्था मजबूत होईल.” असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंडातील बद्रिनाथ धाम येथील माणा गावात उभारण्यात आलेल्या ‘श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिरा’ चा उद्घाटन व लोकार्पण राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी उत्तराखंडाचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू व जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे होते. तसेच, माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, माणा ग्रामपंचायतीचे प्रधान पीतांबर सिंह मोलपा, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, डॉ. हनुमंत कराड व प्रा. स्वाती कराड चाटे हे उपस्थित होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले,“ देव भूमी उत्तराखंडामध्ये श्री सरस्वती न्यास मंदिराची स्थापना होने ही एक ऐतिहासिक घटना है. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांसारखे अनेक संत होऊन गेले. यांनी समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरी, गीता, तुकारामगाथा सारखे ग्रंथ लिहिले. गीता पठण करतांना त्यात भाव आणि भक्ती दिसून येते. याच भक्तीमध्ये तुलसीदास व रामदास यांसारखे अनेक संत डुंबून गेले होते.”
“शंकराचार्यांनी बद्रीनाथ, केदारनाथ व नेपाळमध्ये पशुपती नाथाची स्थापना केली. तसेच, माणा गाव येथे डॉ. विश्वनाथ कराड यांनी श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराची निर्मिती केली. येथे उत्तराखंडातीलच नव्हें तर जगभरातील भक्तगण दर्शनासाठी येतील. त्यामाध्यमातून या गावाची अर्थव्यवस्था ही मजबूत होईल. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्या प्रमाणे भारत हा जगात संस्कारांचा देश म्हणून ओखळला जाईल. एका इंग्रजी लेखकाने म्हटले आहे की, १८ वे शतक हे विज्ञानाचे, १९ वे तंत्रज्ञानाचे आणि २१ वे शतक भारताचे अध्यात्माचे असेल.”
त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले,“ या देशात अनेक धर्तीपुत्रांनी कर्तव्य बजावत अनेक गावे उभी केली. त्याचप्रमाणे डॉ. कराड यांनी प्रयागअक्कांच्या आशीर्वादाने रामेश्वर गावात मोठी सुधारणा केली आहे. डॉ. कराड यांनी सरस्वती मंदिर उभे करुन माणा गावाची शोभा वाढविली आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संतांचे मोलाचे योगदान आहे. याच अध्यात्माच्या आधारे भारत २१ व्या शतकात जगाचे नेतृत्व करेल.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ ज्ञानाची देवता सरस्वती असून या देशात प्राचीन काळापासून तिची पुजा होते. श्री सरस्वती मातेच्या मंदिराचे उद्घाटन होणे हे भारत आणि जगाच्या इतिहासातील महत्वाची घटना आहे. या देशात प्राचीन सांस्कृतीचे कार्य होत असून पुन्हा ज्ञानाची संस्कृती अवतरित होत आहे. ही महान संस्कृती भारताच्या माध्यमातून होत असून आता विश्वाच्या नव्या अध्यायाची सुरूवात झाली आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“१२ वर्षापूर्वी माझ्या ज्येष्ठ भगिनी पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड व काही गणमान्य व्यक्तीबरोबर माता सरस्वती नदीच्या मूळ उगमाचे दर्शनघेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा विचार आला की देवी सरस्वतीला समर्पित, सुंदर आणि आकर्षक असे मंदिर या ठिकाणी बांधावे. योगायोगाने माणा गावचे प्रमुख पितांबर सिंग मोलपा यांची भेट होऊन त्यांच्याशी मंदिर निर्मिती चर्चा झाली. आज ते साकार होतांना खूप आनंद होत आहे. या सरस्वती भूमिचे म्हणजेच माणा गावातील कोणत्याही विद्यार्थी आमच्या संस्थेत इंजीनियरिंग व वैद्यकीय शिक्षण घ्यायला येईल त्याला आम्ही संपूर्णपणे मोफत शिक्षण देऊ.”
माणा ग्रामपंचायतीचे प्रधान पीतांबर सिंह मोलपा यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.