पुणे : भारत हा देश तत्वज्ञानाचा जन्मदाता देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील देशांपैकी एक देश आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानातून जगाला शांतीचा संदेश आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत आहेत. भारतीय संस्कृती, ज्ञान, तत्वज्ञ, संस्कृती, परंपरा आणि जागतिक तत्वज्ञानाचे संगम या जगातील सर्वात भव्य गोल घुमटात झाल्याचे दिसून येते आहे. यामुळे भारतीय संस्कृती ही खऱ्या अर्थाने ज्ञानाचे दालन म्हणून जगापूढे येईल, असे प्रतिपादन हिंदुजा ग्रुपचे संस्थापक प्रकाश हिंदुजा यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रकाश हिंदुजा यांच्या पत्नी सौ. कमल हिंदुजा, एमआयटी विश्वशाती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ. दा. कराड, शहानी ग्रुपच्या प्रमुख माया शहानी, रुपमेक इलेक्ट्रीकल्स कंपनीचे अध्यक्ष उद्योजक नाणिक रुपानी, इंडिया अहेड न्यूज चॅनल आणि आंध्र प्रभा हैद्राबादचे संचालक गौतम मुथ्या, के. पी. बी हिंदुजा कॉलेजच्या प्राचार्या डॉ. मिनू मडलानी, विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहूल कराड आदी उपस्थित होते.
प्रकाश हिंदुजा म्हणाले, भारतीय संस्कृती ज्ञानाचे माहेरघर आहे. या देशातील अनेक संत-महंत आणि तत्वज्ञ यांनी जगाला विश्वशांती व मानव कल्याणाचा संदेश दिला आहे. हाच संदेश भविष्यातील नवतरुणांना अविरतपणे देण्याचे कार्य या जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटाच्या माध्यमातून होत राहिल. तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय केवळ मानवी मनुष्यबळाच्या सहाय्याने उभारण्यात आलेला हा गोल घुमट एक अद्भूत आणि स्थापत्य कलेच दर्शन घडविणारा अद्भूत नमूना आहे. व्हिजन आणि दूरदृष्टीचे दर्शन घडवत जागतिक स्तरावरील शिक्षण देण्याचे कार्य ही एमआयटी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
माया शहानी म्हणाल्या, भारत हा देश एकता आणि विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक जाती-धर्मांचे नागरिक बंधुभावाने नांदतात. एकतेचे आणि विविधतेचे प्रतिक म्हणून भविष्यात हे जगातील सर्वात मोठे गोल घुमट ओळखले जाईल. भारतीय तत्वज्ञान आणि सांस्कृतिक शिक्षणाचे धडे भविष्यात या भव्य घुमटाच्या माध्यमातून नवतरुणांना मिळत राहिल.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटातील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज सभागृहात उभारण्यात आलेल्या ५४ पुतळ्याच्या माध्यमातून जगाला विश्वशांतीचा संदेश देण्याचा कार्य होत राहिल. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे दर्शन या घुमटालामुळे जगाला मिळत राहिल. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाचे संगम या घुमटात झाल्याचे चित्र आहे.