पुणे- गणेशोत्सवाला माेठी परंपरा असून माेठ्या थाटामाटात हा उत्सव पार पाडला जाताे. मात्र, उत्सवादरम्यान काही कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीत मद्यपान करून धिंगाणा घालतात. त्यामुळे उत्सवाला गालबाेट लागते, याचे भान कार्यकर्त्यांनी बाळगले पाहिजे. गणेशोत्सवादरम्यान दारू प्याल तर ११ दिवस पाेलिस काेठडी दिली जाईल, असा सबुरीचा इशारा अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय गणेशाेत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बाेलत हाेते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, नगरसेविका शारदा सोनवणे, भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, धार्मिक सण साजरा करताना प्रत्येकाने इतर धर्माचा अनादर हाेणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पुणे आणि परिसरातील सर्वच गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत यंदाच्या वर्षी केली पाहिजे. गणेशोत्सवादरम्यान जनजागृतीपर देखावे तयार करून सामाजिक संदेश देतात, त्यांचा मला अभिमान वाटताे. मात्र, विसर्जनावेळी मूठभर कार्यकर्ते दारू पिऊन धिंगाणा घालतात. त्यामुळे उत्सव अाणि मंडळाच्या प्रतिमेला गालबाेट लागते, याचे भान कार्यकर्त्यांनी बाळगले पाहिजे. उत्सवादरम्यान दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना ११ दिवस पोलिस कोठडी देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ” मंडळांनी समाजप्रबोधनात्मक देखावे करण्याची गरज आहे. 2017 मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 126 सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. त्यातील 96 मंडळे बक्षिसांसाठी पात्र ठरली आहेत. ट्रस्टतर्फे 11 लाख 66 हजार रुपयांची बक्षिसे यंदा प्रदान करण्यात येणार आहेत”
आमदार महेश लांडगे यांनी केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीला गणपती मंडळांनी पुढाकार घेऊन सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले.
आकुर्डी गावठाणातील श्रीकृष्ण-क्रांती मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. भोसरीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाला द्वितीय तर चिंचवडच्या एस. के. एफ. गणेशोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेत चौथा व पाचवा क्रमांक निगडीच्या जय बजरंग तरूण मंडळ व खंडोबा मित्र मंडळाने मिळविला. ही स्पर्धा प्रभागनिहाय घेण्यात आली. दत्तात्रय भोंडवे, दिलीप माळी, श्रीकांत ताकवले, संतोष ढोरे, प्रफुल्ल तोरसे, संभाजी सूर्यवंशी, संजय कुंभार, रामदास चिंचवडे व वैभव गोडसे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.