पुणे-राज्याला नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळेल आणि तो महाविकास आघाडीचाच असेल, असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. येत्या नवीन वर्षात राज्यात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. त्यात राज्याला नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान बाळासाहेब थारेात पुढे बोलताना म्हणाले की, भाजपची राजकारण करण्याची एक पद्धत आहे. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करतात. विरोधकांवर कारवाया होतात, पण भाजपमध्ये गेल्यावर कारवाया होत नाहीत. नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून तसे कळवले होते. त्यावरही थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांच्यासंदर्भात पत्र लिहिण्याची गरज काय होती? दोघेही नेते एकत्र असतात. सभागृहातही एकाच ठिकाणी बसतात. बैठकांमध्येही एकत्र असतात, मग पत्र लिहिण्याची गरज काय असा सवाल थारोतांनी उपस्थित केला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर बाबींवर मी बोलणे योग्य होणार नाही. मात्र, जो वेळ लागतोय तो योग्य नाही. इतका वेळ का लागतोय याबाबत गावातील एखाद्या मुलालाही विचारले तरी तो कारण सांगेल, असा टोला त्यांनी लगावला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मात्र, अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. त्या तिघांमध्ये आपांपसात वाद सुरू आहे. त्यांचे जनतेकडे लक्ष नाही. राज्यात अनेक पदे रिक्त आहेत. नोकरभरती होत नाही. भरती करायला गेले तर घोटाळे होतात. पेपरफुटी होते. सरकार आहे की नाही, अशी परिस्थिती राज्यात असल्याची टीका त्यांनी केली आहे.