मुंबई- बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आहे. या मतदार संघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. या आधी देखील पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. तर आता पुढील काळात बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार याची बारी आहे का? असा पश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्याला कारणही तसेच आहे. सुप्रिया सुळे यांच्या विजयाची माहिती देताना शरद पवार यांनी थेट बारामती विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या मतदानाची आकडेवारी समोर ठेवली. इतकेच नाही तर मला बारामतीतील जनतेची मानसिकता मला माहिती असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवार यांना थेट इशाराच दिला असल्याचे या निमित्त बोलले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जयंत पाटील यांच्या नेतृत्वात चांगले यश प्राप्त केले आहे. आम्ही लढलेल्या एकूण जागांपैकी सात जागांवर आम्ही विजयी होत असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला. दहा जागा लढवल्यानंतर सात जागी विजय मिळवला, हा आमचा चांगला स्ट्राईक रेट असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मताधिक्य वाढले आहे. हे केवळ एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचे यश नाही तर हे महाविकास आघाडीचे संयुक्त यश असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सर्वांच्या मेहनतीचे हे यश असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.