जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र
पुणे : पुण्याच्या बाणेर, बालेवाडी हायस्ट्रीट, भूगाव, भूकुम, वाकड या परिसरात पब, बार उशिरापर्यंत पर्यंत सुरू राहत आहेत. हे पब, बार बाहेरून बंद असले तरी आतून सुरू असतात. त्यामुळे या भागात अजूनही उशिरापर्यंत धिंगाणा सुरूच आहे. तो रोखला जावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी येथे केली.
शहरात वाढत असलेल्या पब संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागणीचे पत्र दिले. यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले, पुण्यात पब संस्कृती वेगाने फैलवली आहे. कल्याणी नगर भागात या पब संस्कृतीतूनच अपघात घडला आणि दोन निष्पाप जीव या अपघातात गेले. या घटनेतील आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस व आरोग्य विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी गुंतल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आमचा संघर्ष सुरू आहे. त्याचवेळी पब संस्कृतीला आवर घालण्यासाठी, ही पब संस्कृती मोडून काढण्यासाठी आमची धडपड सुरू आहे.
त्यामुळेच सध्या शहरात वेगवेगळ्या भागात पब, बार, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई सुरू आहे. पण पोलिस, पालिका, उत्पादन शुल्क विभाग यांचे पुण्याच्या भूगावसह पश्चिम भागाकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अकरानंतर येथे मद्य विक्री केली होत नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र मद्यविक्री राजरोसपणे सुरूच आहे.
त्यामुळे धिंगाणा वडला आल्याने स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक, भूगाव,भुकुम हा निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर आहे. येथे नयनरम्य तलाव आहे. अनेक लोक पर्यटनासाठी येथे येतात त्यामुळे या परिसराचे सौंदर्य टिकून राहिले पाहिजे. याबाबत आपण योग्य ती पावले उचलावी, अशी मागणीही आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.