नाशिक-लोकसभा निवडणूकीत मी महायुतीकडे दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, शिर्डीला सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही जागा देण्यात आली नाही. मात्र, मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे, आणि यावेळी मला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी दिले आहे, असा दावा रिपाई आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
रामदास आठवले हे नाशिक दौऱ्यावर महायुतीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुका म्हटले की, साहजिकच प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची ताकद दाखवायची असते. या निवडणुकीत देखील रिपाईला दोन जागा मिळाव्या अशी मी मागणी केली होती. कारण दोन जागांमुळे मला मिळणारी मते राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास उपयुक्त ठरली असती. मात्र, दोन्ही जागा नाकारल्या गेल्या. परंतु राज्यसभेत मला संधी मिळेलच आणि यंदा मला कॅबीनेट मंत्रीपद देण्याचे आश्वासन देखील मिळालेले आहे.
रामदास आठवले म्हणाले की, यंदा लोकसभा निवडणूकीत एनडीएला अत्यंत अनुकूल वातावरण असून चारशे जागा मिळतीलच असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात काहीही झाले तरी आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडू येथे प्रथमच भाजपाला अधिक जागा मिळतील, असा दावा देखील त्यांनी केला.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेले कथित वादग्रस्त विधान त्यांनी केलेच नसावे असे मत रामदास आठवले म्हणाले. संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळच दिले आहे, त्यामुळे नड्डा असे बोलले असतील असे मला वाटत नाही, असे ठाम मत देखील रामदास आठवले यांनी मांडले.