पुणे: पुणेकरांनी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी निवडून देवूनही पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? असा सवाल काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना केला. तेसच या प्रश्नाचे उत्तर पुणेकर मतदानाच्या माध्यमातून देतील आणि आपणास विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणुक धनशक्ती विरुद्ध जणशक्तीची असून पुढील दोन दिवसात पुण्यात पैशाचा पाऊस पडेल. यावर प्रशासनाने योग्य ते प्रतिबंधनात्मक उपाय करावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा ईशाराही धंगेकर यांनी दिला.
पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सांगता समारंभाप्रसंगी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नागपूरचे आमदार विकास ठाकरे, निवडणुक प्रमुख मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, दीप्ती चवधरी, पूजा आनंद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी, अमीर शेख, माध्यम समन्वयक राज अंबिके, आदींसह महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे पदाधिकारी उपस्थित होते.
धंगेकर म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी काढलेल्या पदयात्रा, मेळावा, सभांना पुणेकरांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ मी पिंजून काढला आहे. गेल्या तीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने पुण्याचे प्रश्न मी जाणतो. सर्वांना सोबत घेवून मी सामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे. मोदींच्या कारभारामुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. गेल्या दहा वर्षात पुण्याच्या विकासाला खिळ का बसली, हे पुणेकर या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला विचारतील आणि महाविकास आघाडीला विजयी करतील. पुणे धार्मिक सलोख्याचे शहर आहे, ही परंपरा मी कायम राखणार आहे.
वंचित व एमआयएम भाजपची बी टीम असून ही निवडणुक पुणेकरांनी हातात घेतली आहे. भाजप पैसे देवून सभांना गर्दी करत होते. आज व उद्या भाजपचे लोक पैशाचा महापूर आणतील, दमदाटी करतील, पोलिसांनी यावर निर्बंध आणावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.
माझी ही दहावी निवडणुक आहे, माझ्या पहिल्या निवडणुकीपासून सोबत असलेले लोक आजही सोबत आहेत. मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे. भाजपने काय विकास केला, हे काल राज ठाकरे सभेत बोलले आहे. ते पुण्याच्या विकासावर बोलले, त्यांचा रोख भाजपकडे होता. या सभेत त्यांनी कमळाला मत द्या, असे एकदाही म्हंटले नाही. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.
प्रचाराची सांगता आम्ही प्रत्येक विधानसभा मतदार संघात रॅली काढून केली. संविधान टिकवण्यासाठी आम्ही सदैव उभे राहू आणि या निवडणुकीत चांगल्या मताने निवडून येऊ, असा विश्वासही धंगेकर यांनी व्यक्त केला.
मोहन जोशी म्हणाले, निवडणुक सुरू झाल्यापासून 37 पदयात्रा, कॉर्नर सभा घेवून काँग्रेसचा न्यायनामा घरोघरी पोहचवला आहे. महागाई व बेरोजगारीमुळे धंगेकर यांचा विजय निश्चित आहे. दहा वर्षात केलेले एक काम भाजप नेत्यांना सांगता येत नाही. पक्ष फोडले, हे जनतेला आवडलेले नाही. भाजपची ताकद कागदावरच आहे, हे प्रचारावरून पुढे आले आहे. ज्या दिवशी कसबा पोटनिवडणुक जिंकली, तेव्हाच लोकसभेचा गड काँग्रेस जिंकणार हे निश्चित झाले होते. या निवडणुकीत प्रचाराची पातळी आम्ही राखली, कमरेखालचे आरोप केले नाहीत. याउलट भाजपने खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. भाजपची बी टीम असलेल्या वंचित व एमआयएमचा कोणताही परिणाम पुणेकरांवर व निवडणुकीवर होणार नाही. आम्ही निवडणुकीपूर्वी रेसकोर्स मैदान संरक्षण खात्याकडे मागितले होते, त्यावेळी त्यांनी आम्ही राजकीय पक्षांना मैदान देत नाही, असे लेखी दिले. त्यानंतर आचारसंहिता असतानाही संरक्षण विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेसाठी रेसकोर्स मैदान दिले. मोदींच्या सभेनंतर पुन्हा भाजपला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा घ्यावी लागली. यातच भाजपचा पराभव स्पष्ट होतो.
उल्हास पवार म्हणाले, ही निवडणुक हिंदु मुस्लिम मुद्द्यावर आली, एका मतदार संघात मतदान सुरू असताना शेजारच्या मतदार संघात पंतप्रधान सभा घेतात, यातच मोदी व भाजपचा पराभव होणार हे स्पष्ट होते.