पिंपरी, दि. 8 मे – मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तिसऱ्यांदा दिल्लीत जातील, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी जानकर बुधवारी पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी त्यांनी पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते योगेश बहल, भाजप नेते सदाशिव खाडे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.
जानकर म्हणाले की, एकदा युती झाल्यानंतर महायुतीचे सर्व नेते जुने सर्व विसरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकर्ते मन लावून श्रीरंग बारणे यांचे काम करत आहेत. बारणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार, पार्थ पवार व जय पवारही येतील.
महायुतीचे सर्व घटक पक्ष एकजुटीने बारणे यांचे काम करत आहेत. आम्ही एकदिलाने त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मित्र पक्षांना सन्मानाची वागणूक दिली तर विधानसभा निवडणुकीतही महायुती कायम राहील. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास अजित पवार यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवडला आल्यावर अमेरिका, रशियाला आल्यासारखे वाटते, असे जानकर म्हणाले.
या देशाचा पंतप्रधान ओबीसी समाजाचा आहे, ही अभिमानाची बाब आहे. ही देशाची निवडणूक आहे. देश सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी मतदान करावे. काँग्रेसने ओबीसीला घटनात्मक दर्जा दिला नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दर्जा दिला. ओबीसीला सर्वाधिक राजकीय भागीदारी देणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने फक्त एक ओबीसी उमेदवार दिला आहे. दुसरीकडे भाजपने 7 ओबीसी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ओबीसींनी महायुतीला मतदान केले पाहिजे, असे आवाहन जानकर यांनी केले
मोदी यांच्या हातात सत्ता म्हणजे देशाचे संरक्षण हे सूत्र आहे. जगात देशाचे नाव उंच करण्याचे काम ते करतात. त्यामुळे मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी काळेवाडीच्या मेळाव्यात केले.