पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरड्यासारखा रंग बदलत आहेत. त्यांच्या 400 पारच्या नाऱ्यात कोणताही दम नाही, अशी टीका टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारवर निशाणा साधताना केली. महाविकास आघाडीने आम्हाला 2 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. पण आम्ही त्यातून बाहेर पडलो. आम्ही पूर्वीपासूनच निवडणुकीची तयारी केली होती, असेही ते यावेळी म्हणाले.
भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला आहे. पण सर्व्हेनुसार त्यांच्या जागा 300 हून खाली घसरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडणूक आल्यास ते संविधान बदलतील. कारण ते सरड्यासारखे रंग बदलत आहेत. ते कर्नाटकातील मुस्लिम समाजाला ओबीसी आरक्षण देण्याविषयी वेगळी भूमिका मांडत आहेत, असे प्रकाश आंबेडकर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
मुंबईत मुस्लिम मतदारांसह बिहार, उत्तर प्रदेश व दक्षिण भारतातील मतदारांचे मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. भाजपने राज ठाकरे यांना साेबत घेऊन स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईतील बिहार व उत्तर प्रदेशातील नागरिकांनी उन्हाळी सुट्टीत गावी जाण्यासाठी 26 विशेष रेल्वे गाड्यांची मागणी करणारे पत्र दिले आहे. त्यामुळे हे मतदार मतदानाच्या दिवशी मुंबई बाहेर गेल्यास, जाे नियमित मतदार भाजपचा आहे त्याचा फायदा त्यांना हाेऊ शकेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आंबेडकर म्हणाले, निष्ठावंत मतदार हा काँग्रेसकडे आहे. अकाेल्यामध्ये मी पाहिले की, काँग्रेसने मुस्लिम उमेदवार न देता हिंदू उमेदवार देऊन पुन्हा हिंदू मतदार आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचा ठराविक मतदार असून त्यांचे किती मतदार त्यांनी मतदानावेळी बाहेर काढले हे महत्वाचे आहे. जाे काेणी त्याठिकाणी जिंकेल ताे 25 हजाराने जिंकेल. काँग्रेस व ठाकरे गटाच्या हिंदू मतदारांचे मतदान ट्रान्सफर हाेत नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट मुस्लिम मते वळवताना दिसत आहे.
या निवडणुकीत सगळ्यात दुर्लक्षित केले जाणारी एकनाथ शिंदे विरुध्द उध्दव ठाकरे अशी निवडणूक 12 मतदारसंघात हाेते. त्यात वंचितचा फायदा होणार आहे. त्या ठिकाणी सेक्युलर मतदार आमच्याकडे वर्ग हाेत आहे. सगळ्याच ठिकाणच्या निवडणुकीत असे माेठ्या प्रमाणात हाेत आहे. शिवसेना भाजप साेबत जाणार नाही हा प्रश्न उमेदवारांना मुस्लिम मतदार विचारत आहे. त्यांचे समाधान झालेले नाही, असेही आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.
मागील निवडणुकीत जे भाजप उमेदवार लाखाच्या फरकाने निवडून आले, त्यांची यंदा परिस्थिती अवघड झाली आहे. 2014 ते 2022 दरम्यान शासनाने अधिकृतपणे सांगितले की, 17 लाख हिंदू कुटुंबांची मालमत्ता कमीत कमी 50 काेटींची आहे. ते परदेशात जाऊन बसले आहेत. त्यामुळे जे स्थलांतरित झालेत ते परत येऊ शकतात. पण अनेकजण देशाचे नागरिकत्वच साेडत आहेत, असे आंबेडकर म्हणाले. भाजपने निवडणूक रोख्यांची सक्ती केली होती का? हे स्पष्ट करावे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली. हिंदू समाजाचे ठेकेदार समजणारे देशाचे नागरिकत्व साेडणाऱ्या बाबत काही बाेलत नाही, असे ते म्हणाले.