पुणे : देशात महागाई आणि बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे. जनतेला घरातील दागिने विकून घर चालवावे लागत आहे. गरीब लोक रस्त्यावर आले आहेत. अशा घटनेतून ‘मंगळसूत्रा’वर खरा डोळा भाजपचाच आहे, हे सिद्ध होते… अशा शब्दांत पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर आज तोफ डागली.
एका जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसला तुमचे मंगळसूत्र हिसकावून घ्यायचे आहे’, अशी टीका केली होती. या टीकेला काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या सडेतोड उत्तर दिले. जवळपास ६० वर्षे काँग्रेसची सत्ता आहे. या काळात कधी काँग्रेसने कोणाचे मंगळसूत्र हिसकवले? याचे एकही उदाहरण नाही. उलट इंदिरा गांधींनी युद्ध झाले तेव्हा त्यांचे सोने देशाला दिले. माझ्या आईचे ‘मंगळसूत्र’ देशासाठी शहीद झाले, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर बोलत होते. ते म्हणाले, देशात कोरोना येवू शकतो. सतर्क रहा, असे सर्वप्रथम काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना सांगितले होते. पण, मोदींनी ते लक्षात घेतले नाही. देशात कुठलीही पूर्वतयारी केली नाही. नंतर पुढे एका दिवसात लॉकडाऊन करून टाकले. सर्वसामान्यांचे अर्थचक्र ठप्प झाले. यात देशातील लाखो लोक मृत्यूमुखी पडले. असेच नोटबंदीच्या जाचक निर्णयातूनही घडले. मग ‘मंगळसूत्रा’वर डोळा कोणाचा आहे? हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
हमीभावासाठी पंजाब, हरियाणामधील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्यावर लाठी उचलण्यात आली. लाठी हल्ल्यामुळे, कडाक्याच्या थंडीमुळे, पावसामुळे अनेक आंदोलनकर्ते शेतकरी रस्त्यावर मृत्यूमुखी पडले. अशा घटनेत मंगळसूत्रा’वर कोणाचा डोळा होता, हेही जनतेला माहिती आहे. जनता सुज्ञ आहे. ती मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना योग्य ते उत्तर देणार आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.