बेंगलोर -काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सोने आणि मंगळसूत्र’ या वक्तव्यावरून निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, त्यांची आई सोनिया गांधी यांनी देशासाठी आपल्या मंगळसूत्राचे बलिदान दिले आहे.
बंगळुरूमध्ये एका निवडणूक सभेत बोलताना प्रियंका म्हणाल्या, या देशात काय चालले आहे? काँग्रेसला तुमचे मंगळसूत्र हिसकावून घ्यायचे आहे, अशी भाषणे दोन दिवसांपूर्वी देण्यात आली. गेल्या 75 वर्षांपासून हा देश स्वतंत्र झाला असून 55 वर्षे काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसने कधी तुमचे सोने किंवा मंगळसूत्र हिसकावले का?पंतप्रधान नेरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवताना प्रियंका म्हणाल्या की, जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा आजी इंदिरा गांधींनी त्यांचे सोने दान केले होते.वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत त्या पुढे म्हणाल्या की, माझ्या आईच्या मंगळसूत्राने या देशासाठी बलिदान दिले आहे. नरेंद्र मोदींना ‘मंगळसूत्र’चे महत्त्व कळले असते तर त्यांनी अशा अनैतिक गोष्टी बोलल्या नसत्या. नोटाबंदी झाली तेव्हा त्यांनी महिलांची बचत हिरावून घेतली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात 600 शेतकऱ्यांनी जीव गमावला, मोदीजींनी त्या विधवांच्या मंगळसूत्राचा विचार केला का? मणिपूरमध्ये एका महिलेला विवस्त्र करून तिचे कपडे जाळण्यात आले तेव्हाही मोदीजी गप्प राहिले काहीही बोलले नाहीत, अशा शब्दात प्रियंका यांनी मोदींचा समाचार घेतला.
प्रियंका पुढे म्हणाल्या, ते आज महिलांना मतदान करण्यासाठी अशा गोष्टी सांगत आहे, त्यांना घाबरवत आहे जेणेकरून त्या घाबरून मतदान मतदान करतील. अशा गोष्टी करायला त्यांना लाज वाटायला पाहिजे.आपल्या भाषणाच्या शेवटी प्रियंका म्हणाल्या, “एक काळ असा होता की जेव्हा एखादा नेता उभा राहीला की देशातील जनतेला त्याच्याकडून नैतिकतेची अपेक्षा असायची. पण आज देशाच्या सर्वात मोठ्या नेत्याने नैतिकता सोडली आहे.”
“आज देशाचा सर्वात मोठा नेता आपला प्रभाव, आपला अभिमान आणि आपली कीर्ती दाखवण्यासाठी बाहेर पडतो, परंतु एक काळ असा होता की नेते परोपकारी होते आणि सेवाभिमुख पण आता देशातील सर्वात मोठ्या नेत्यामध्ये लोकांना फक्त अहंकार दिसतो,” अशा शब्दात प्रियंका यांनी पंतप्रधानांवर टिकास्त्र सोडले.