पुणे, दि. २२ एप्रिल : ” सर्व विरोधक जर एकत्र आले, तर निश्चित समाजावे की राजा प्रामाणिक आहे. दोन हजार वर्षापूर्वी आर्य चाणक्याने जे लिहून ठेवले, ते आजही सर्वार्थाने लागू आहे. याचे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे आता होऊ घातलेली लोकसभा निवडणूक असून याच काळात ही पुस्तक प्रकाशित होणे महत्वाचे संकेत आहे.” असे मत कार्यक्रमाचे लेखक व पत्रकार डॉ. रवींद्र गुर्जर यांनी व्यक्त केले.
मतदार जागृतीसाठी आणि समृध्द लोकशाहीसाठी माजी वायुसेना व माजी पोलिस अधिकारी अनिल शां. पाटील यांनी लिहिलेल्या ‘चोरांची लोकशाही’ या पुस्तकाचे प्रकाशन टिळक रोड येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पद्मजी हॉल येथे लेखक व पत्रकार डॉ. रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार बबन पोतदार, राजहंस प्रकाशनचे संपादक डॉ. सदानंद बोरसे आणि देशभक्त कोशकार चंद्रकांत शहासने, व प्रतिभा पाटील या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी सेलिब्रेशन अॅट सिक्टी या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. यावेळी अनिता पाटील व प्रतिभा पाटील या उपस्थित होत्या.
डॉ. रवींद्र गुर्जर म्हणाले,” जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामधील वास्तव परिस्थिती काय आहे. लोकशाही खरोखर अस्तित्वात आहे का. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या देशात खरे राष्ट्रनिष्ठ आणि सर्वस्व झोकून देण्याची तयारी असलेल्या लोकांचे प्रमाण किती आहे, हे तपासणे गरजेचे आहे. पंतप्रधान पं. नेहरू गेल्यानंतर देशासमोर प्रश्न पडला होता की पुढील पंतप्रधान कोण आहे. पण लोकशाहीने ते दाखवून दिले. तसेच नरेंद्र मोदी नंतर ही या देशात बरेच पंतप्रधान येतील.”
चंद्रकात शहासने म्हणाले,” आम्ही चोर आहोत हे ज्या दिवशी या देशात थांबेल तेव्हाच आम्ही विश्वगुरू बनेल. संविधाच्या आधारावर चाललेल्या या देशात कालानुरूप काही चुका आहेत. त्याचे आता परीक्षण होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांचा संभ्रम, चीड, संताप, अगतिकता या सर्व गोष्टी लेखकाने पुस्तकात मांडल्या आहेत.”
डॉ. सदानंद बोडसे म्हणाले, ” भ्रष्टाचारी सदैव अस्तित्वात राहतात याला आपणच जबाबदार आहोत. अशावेळेस चोरांच्या विरोधात उभे राहणे गरजेचे आहे. देशात लोकशाही टिकवायची असेल तर मतदातांनी सजग होऊन चिंतन, मनन करून योग्य मतदान करावे. कोणतीही सुधारणा करावयाची असेल तर मतभेद होणे ही गरजेचे आहे.”
बबन पोतदार म्हणाले, ” चोरांची लोकशाही सारखे पुस्तकांची निर्मिती होणे म्हणजे सर्वांना विचार करण्याची वेळ आली आहे. वाढता भ्रष्टाचार हा देशाला पोरखून ठेवणारा आहे. अशावेळेस मतदातांनी जागृत राहून संविधानाचा अभ्यास करावा आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालावा.”
अनील पाटील म्हणाले,” देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झालीत परंतू आज ही हा देश बर्याच समस्यांनी ग्रस्त आहे. स्वातंत्र्यानंतर कल्याणकारी योजनांचा पाऊस पडला खरे परंतू गरिबी काही संपली नाहीच परंतू भ्रष्ट लोकांमुळे आज लोकशाहीला नुकसान पोहचले आहे. चोरांची लोकशाही हा विषय गेल्या ८वर्षापासून डोक्यात होता. या पुस्तकात संविधान, हक्क आणि कर्तव्य, राजकारणात गुन्हेगारांचा प्रवेश, घराणेशाही, न्यायव्यवस्था, भ्रष्टाचार, प्रसार माध्यमे यांचा उहापोह केलेला आहे.”
सूत्रसंचालन प्रा. अतुल कुलकर्णी यांनी केले. आकाश पाटील यांनी आभार मानले.