पुणे : पाण्यापासून पुणेकर वंचित राहता कामा नयेत. यासाठी शहरात सुरळीत आणि पुरेसे पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे बुधवारी पत्राद्वारे केली.
पुण्यातील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांमधून ओरड होत आहे. याची दखल घेवून आमदार रवींद्र धंगेकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केली. ते म्हणाले, यंदा वरुणराजाने पाठ फिरवल्याने पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी जलसंकट कोसळले आहे. अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे. जनतेला पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचा आरडाओरडा सुरू आहे. पण, सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत, प्रशासनापर्यंत पोहचत नाही, असे दिसून येत आहे. असेच चित्र पुण्यातही आहे.
पाणी मिळत नसल्याने पुणे शहरात आणि उपनगरात अनेक ठिकाणी नागरिक चिंतित आहे. पाण्यासाठी आरडाओरडा करीत आहेत. पाण्यावाचून होणारे नागरिकांचे हाल, त्यांच्या व्यथा शहरातील वृत्तपत्रात उमटत आहेत. पण, तरीही अद्याप पाण्याचे योग्य नियोजन झाले नसल्याचे आणि पाणी नागरिकांना मिळत नसल्याचेच दिसून येत आहे, असे सांगून आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, पालिकेने पाण्याचे योग्य नियोजन करून त्याबाबतचा आराखडा पुणेकरांसाठी जाहीर करावा. शहर व उपनगरातील सर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर भर द्यावा. पालिकेत समाविष्ट झालेल्या अनेक गावांमध्ये जलवाहिन्या नाहीत. काही ठिकाणी जलवाहिन्या असूनही पाणी नाही. अशा ठिकाणी टँकरच्या माध्यमातून दररोज पाणी पोचवावे.
पाणी टंचाईच्या काळात शहरात कोठे-कोठे पाण्याची नासाडी होत आहे, यावरही पालिकेने बारकाईने लक्ष ठेवावे. वाहने धुण्यापासून ते बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यव होत आहे, अशा तक्रारी आमच्याकडे येत आहेत. याबाबतही पालिकेने पावले उचलावीत, असे आमदार रवींद्र धंगेकर सांगितले.