पुणे- गावाच्या सुनियोजित व शाश्वत विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत प्लॉटिंगला बंदी घालावी असे आवाहन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे उपायुक्त रामदास जगताप यांनी केले.सुदवडी येथील नवनियुक्त सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थांनचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील होते.
यावेळी जगताप म्हणाले, प्रत्येक गावच्या सरपंचाने आपल्या भागात अनाधिकृत प्लॉटिंग होवू देवू नये तरच आपलं गाव अनाधिकृत बांधकाम मुक्त राहील. पीएमआरडीएने नियोजनबद्ध व शाश्वत विकासासाठी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला असून लवकरच हा आराखडा मंजूर होईल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.कोणीही यापुढे अनधिकृत बांधकाम करू नये आणि पीएमआरडीएने मंजूर केलेल्या मंजूर रेखांकानातील भूखंड गृह बांधणीसाठी नागरिकांनी खरेदी करावेत. यामुळे गावच्या विकासासाठी मोठे रस्ते, खुले क्षेत्र व पुरेशे सुविधा क्षेत्र उपलब्ध होईल. प्राधिकरणाबद्दल ग्रामस्थांच्या मनात खूप गैरसमज आहेत. ते गैरसमज दूर व्हावे हा उद्देश ठेवून आपण या ठिकाणी आलो आहोत, असे देखील त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न विकता शहरी विकासातील भागीदार व्हावे. 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्राचे सर्व शेतकरी एकत्र आले तर त्याच्या विकासाठी व नियोजानासाठी पीएमआरडीए संपूर्ण सहकार्य करेल असे देखील रामदास जगताप यांनी सांगितले.
जगताप यांनी सहा वर्ष राज्यातील शेतकर्यासाठी महत्वाचा असणारा सातबारा संगणीकृत करून ऑनलाईन करण्यासाठी अथक परिश्रम घेतले म्हणून आज सर्वसामान्य लोकांना पंधरा रुपयात ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरीत सातबारा मिळतो. यासाठी कृतज्ञता व्यक्त करीत संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांनी सरपंच आणि उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांना पुढील विकासासाठी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.