स्त्री आधार केंद्र व गरवारे महाविद्यालय पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचा पुढाकार
पुणे दि.२३: काही दिवसांपूर्वी विधिमंडळाला गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भेट दिलेली होती. त्यावेळी महिला मतदारांच्या लोकप्रतिनिधी यांचे कडून काय अपेक्षा आहेत याबाबत चर्चा झाली होती. त्याचाच पुढचा भाग म्हणून राज्यातील महिला मतदारांचे सर्व्हेक्षण करण्याचे निश्चित झाले आहे. यासाठी स्त्री आधार केंद्र व गरवारे महाविद्यालयाचे पत्रकारिता व जनसंज्ञापन विभाग मिळून सर्व्हेक्षण करणार असल्याचे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
आबासाहेब गरवारे महाविद्यालय पुणे येथे पत्रकरिता व जनसंज्ञापन विभाग आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी सुधीर भोसले म. ए. सो. सहायक सचिव, डॉ नूतन कानेगावकर विभाग प्रमुख, प्रा संतोष गोगले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, यापूर्वी स्त्री आधार केंद्रांने महिला मतदारांचा अंदाज घेतला होता. त्यावेळी बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या. त्यामध्ये कुठली नक्की निवडणूक आहे याची अनेक मतदारांना माहिती नसते. तसेच निवडणुकीचा आठवडा जवळ आल्यावर राजकीय जागृती अधिकाधिक होते असे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महिला मतदारांचे सर्वेक्षण पुढच्या महिनाभरामध्ये तीन ते चार टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये महिला मतदारांच्या अपेक्षांच प्रतिबिंब या व येणाऱ्या सर्व निवडणुकात पडावं हे अपेक्षितच आहे.म्हणून अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये परंतु महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून महिला मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा दृष्टिकोन समोर ठेवून सर्वेक्षणाला ३० मार्चपासून सुरुवात होईल. त्याच्यानंतर ते साधारणपणे ३० मे पर्यंत चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. यातून समोर आलेल्या माहितीचे विविध माध्यमांच्या आणि वाहिन्यांच्या मार्फत त्याचे निष्कर्ष किंवा निरीक्षण मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे सर्व्हेक्षण म्हणजे महाराष्ट्रातील ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल नसून तो एक समाजशास्त्राच्या अभ्यासातून महिला मतदारांमध्ये जागृती करण्यासाठीचा अराजकीय उपक्रम असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.