पुणे- बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांचे वय झाले आहे, त्यांनी आता भजन, कीर्तन करावे अशी टीका केली होती. अजित पवार यांच्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
वय नाही तर जिद्द महत्त्वाचे असते असे म्हणत रोहित पवार यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्क व्यक्ती कुस्ती खेळताना दिसत आहे. या व्हिडिओत दिसते त्या प्रमाणे वयाकडे बोट दाखवून तुम्ही थांबत का नाही? असा प्रश्न विचारायचा नसतो, तर पैलवान कधीच म्हातारा होत नसतो, अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये रोहित पवार यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे देखील उदाहरण दिले आहे. कोवळ्या वयात त्यांनी अध्यात्माचा पाया घातला हे कळणे देखील महत्त्वाचे असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांचे आता वय झाले असून त्यांनी भजन कीर्तन करावे, अशा शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टिकेनंतर पवार कुटुंबीय आणि तसेच राज्यातील राजकारणातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तोच धागा पकडत आता आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवार यांचे सख्खे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. अजित पवार हा नालायक माणूस असल्याचे म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. याचे पडसाद राज्याच्या राजकारणात दिसून आले त्यामुळे अजित पवार हे कुटुंबामध्ये एकटे पडले का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. श्रीनिवास पवार यांनी केलेल्या या टीकेचा परिणाम मात्र, युगेंद्र पवार यांना भोगावे लागले. बारामतीकरांनी युगेंद्र पवार यांना घेराव घालत यासंबंधीचा जाब विचारला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पवार विरुद्ध पवार ही लढाई आता कोणत्या पातळीवर जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या संबंधी एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. त्याबरोच त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकाही केली आहे. ते म्हणाले की, ‘वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं… म्हणूनच वयाकडं बोट दाखवून ‘तुम्ही थांबत का नाही?’ असा प्रश्न विचारायचा नसतो..पैलवान कधीच म्हातारा होत नसतो.. राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात भजन करता येतं. त्यामुळं भजनाला वयाशी जोडणं, हेही चुकीचं आहे.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोवळ्या वयात भक्ती आणि अध्यात्माचा पाया रचला हे कळणंही महत्त्वाचं असतं आणि ते कळायला अध्यात्मावर भक्ती आणि आस्था लागते.’