भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचे नाही कृपाशंकर सिंह यांचे नाव यावरूनच काय ते समजा
मुंबई-आगामी लोक निवडणुकीतील लढाई ‘माज’वादीविरुद्ध समाजवादी अशी अशी होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ‘आपकी बार, भाजप तडीपार’ अशी नवी घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज दिली. धारावी मध्ये आयोजित संकल्प समाजवादी गणराज्याचा संयुक्त समाजवादी संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. उमेदवारांच्या पहिला यादीत नितीन गडकरी यांचे नाव हवे होते, असे म्हणत त्यांनी कृपाशंकर सिंग यांना दिलेल्या उमेदवारीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले.
मोदीजी आता फसवाफसवी करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मोदीजी प्रत्येक वेळी वेगवेगळे रूप घेऊन येतात आणि ‘भाई और बहनो’ म्हणत आपण एक असल्याचे सांगतात. अशीच दोन वेळा आमची देखील फसवणूक झाली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आम्ही देखील दोन वेळा नरेंद्र मोदी यांच्या भुलथापांना बळी पडलो होतो. आम्ही पण त्यांना पाठिंबा दिला होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र, आमच्या पदरात धोंडे पडले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मागील दहा वर्षांमध्ये देशांमध्ये केवळ नामांतर झाले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ शहरे, रेल्वे स्टेशन आणि योजनांची नावे बदलायचे काम केले आहे. योजनांची केवळ नावे ते बदलत आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी काहीही केले नाही. मात्र, आता त्यांनी ‘जुमला’चे नावे देखील बदलले आहे. त्यांनी जुमलाचे नाव गॅरंटी केले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. नेत्यांवर केवळ आरोप करायचे आणि आरोप करून त्यांना भाजपमध्ये घ्यायचे. भाजपमध्ये आल्यानंतर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जी 195 लोकांची नावे घोषीत केली, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची नावे आहेत. मात्र, आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा माहित नव्हते. तर भारतीय जनता पक्षाची ओळख ही आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार हे प्रमोद महाजन होते. त्यांचे आणि आमचे घरचे संबंध होते. त्यानंतरच्या काळात नितीन गडकरी यांच्याशी आमचे संबंध आले. त्यांनी महायुती सरकारच्या काळात चांगले काम केले. संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता नितीन गडकरी आहेत. मात्र, असे असले तरी पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याबद्दल ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. महाराष्ट्रातील एकही नाव यादीत नाही, यावरूनही तुम्ही बोलू शकता. मात्र, ज्या व्यक्तीवर तुम्ही कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, त्या महाराष्ट्रातील माणसाला या यादीत स्थान दिले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.