२८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प
पुणे, दि.२६ नोव्हेंबर: “प्रत्येक देशांची संस्कृती वेगळी असली तरी शांती ही संकल्पना एकच आहे. संस्कृती म्हणजे मूल्य व व्यवहार यांचा संगम आहे. चीनचा सर्व क्षेत्रात विकास झाला असला तरी भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्य सर्वेश्रेष्ठ असल्याने भारतच विश्वशांतीसाठी पुढाकार घेऊ शकतो. येथील धार्मिक मूल्य शांतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.”असे मत वैश्विक स्तरावरील व्यावसायिक सल्लागार प्रा.डॉ. रामचरण यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना विश्व शांतीचे नेतृत्व या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी ‘भारत ज्ञान’ चे संस्थापक डॉ. डी.के. हरी व डॉ. हेमा हरी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल वि. कराड, सल्लागार व गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये व व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
प्रा.डॉ. रामचरण म्हणाले,” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २०चे आयोजन केल्याने संपूर्ण जगाची दृष्टी भारताकडे वळली आहे. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी भारताचा दृष्टीकोण अत्यंत महत्वाचा आहे. ग्रामीण क्षेत्रातील मूल्यांना परावर्तीत करून त्याचा उपयोग विकासासाठी करावा. तंत्रज्ञानाच्या युगात जागतिक स्तरावरील कंपन्या भारतात येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वक्षेत्रात मुभा असल्याने संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक विकासासाठी वाव आहे. ”
“शांततेसाठी शिक्षण हे जीवनासाठी शिक्षण आहे. केवळ उपजीविकेसाठी प्रशिक्षण नाही. त्याचे उद्दिष्ट लोकांना मूल्ये, कौशल्ये आणि दृष्टीकोनांनी सुसज्ज करणे आहे. शांती ही संकल्पना खूप सुंदर आहे. परंतू त्या साठी प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असू शकते. अशा वेळेस धार्मिकतेच्या आधारावर चारित्र्य निर्माण करून मूल्याधिष्ठित शिक्षण देणे गरजेचे आहे. अध्यात्मामुळे ऊर्जेचा स्त्रोत मिळतो आणि तोच धागा शांतता निर्मितीसाठी महत्वपूर्ण आहे.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी नितिमत्ता कशी असावी या स्पष्टीकरण केले. बुध्दिमत्ता असली तर कुठे आणि कशी वापरावी हे उदाहरणाने स्पष्ट करून सांगितले. संत साहित्यात मनःशांती मिळत असल्याने त्याचे आत्मसात करावे असा सल्ला ही दिला.
इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजेन्टचे संचालक डॉ. आनंद कुलकर्णी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे दुधारी शस्त्र असल्याचे सांगून त्याचा वापर कसा करावा मानवाच्या हातात आहे.
त्यानंतर योगाचार्य डॉ ज्ञानेश्वर विद्याअलंकार व दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरचे विश्वस्त महेश सुर्यवंशी व वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडले.
प्रा.डॉ.शालिनी टोणपे यांनी सूत्रसंचालन केले व डॉ.मृदुला कुलकर्णी यांनी आभार मानले.