पुण्यातील विद्यार्थ्यांनी राज्यात प्रथम-द्वितीय येत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
पुणे,: “रात्र शाळा ही अतिशय गरजेची आणि समाजासाठी महत्त्वाची शिक्षण व्यवस्था आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून राज्यात अव्वल येणाऱ्या या विद्यार्थ्यांचा संघर्ष खरोखर प्रेरणादायी आहे. माझे पती देखील रात्र महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले आहेत. त्यामुळे अशा शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते,” असे गौरवोद्गार पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी काढले.
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी संचलित आबासाहेब अत्रे रात्र प्रशालेतील दहावी परीक्षेत राज्यात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा महापौर मॅडम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवणारी ही कामगिरी ठरली आहे. रात्र शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घवघवीत यश संपादन केले आहे.
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी संचलित आबासाहेब अत्रे रात्र प्रशालेचा यंदाचा दहावीचा निकाल ८८.८८ टक्के लागला आहे. वसुप्रद वैभव कुलकर्णी यांनी ९०.४० टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर अंकुश काशिनाथ रेवाळे यांनी ८४.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला.
संघर्षातून यश मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या कथा प्रेरणादायी आहेत. वसुप्रद कुलकर्णी यांनी वेदपाठशाळेतील शिक्षण, पौरोहित्याचे काम आणि रात्री अभ्यास करत यश मिळवले. तर अंकुश रेवाळे यांनी दिवसा सुरक्षा रक्षक व बाऊन्सर म्हणून काम करत, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आणि अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास करून हे यश संपादन केले.
यावेळी महापौर मॅडम यांनी पुणे महानगरपालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे, त्यांनी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अशा रात्र प्रशालांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सदस्य भारत वेदपाठक, ज्येष्ठ शिक्षक संजय सातपुते, कुंभार आदी उपस्थित होते.संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव महाजन यांनी संस्था शताब्दी वर्षात पदार्पण करत असताना हे यश महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर ज्येष्ठ शिक्षक संजय सातपुते यांनी रात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिद्दीचा गौरव करत त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे विशेष कौतुक केले.

