मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घटना घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटत आहे. सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे ते म्हणालेत.
भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 65 वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. भिमराव कांबळे असे आरोपीचे नाव आहे. त्याने मृत चिमुकलीला वासरू दाखवण्याचा बहाणा करत गुरांच्या गोठ्याकडे नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. नसरापूर येथे नागरिकांनी पुणे – सातारा महामार्गावर रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला.
पत्रकारांनी आज याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. तीन साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार केला व खूनही केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भही दिसत आहेत. या घटनेमुळे समाजात रोष निर्माण झाला आहे. सर्वांनाच मुलगी व तिच्या कुटुंबीयांबद्दल हळहळ वाटत आहे. मी आश्वस्त करू इच्छितो की, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल.
या प्रकरणी विशेष फास्टट्रॅक कोर्ट स्थापन करण्यासाठी सरकारतर्फे हायकोर्टाला विनंती केली जाईल. तसेच स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही कोर्टापुढे करणार आहोत.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी या प्रकरणाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही चांगलेच फटकारले. हे अत्यंत असंवेदनशील आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणे याहून अधिक वाईट काहीच असू शकत नाही. काही गोष्टीत तरी संवेदना पाळली पाहिजे. त्यांनी काही केले तरी हरकत नाही. पण राज्य सरकार जे करायला पाहिजे, ते नक्की करेन, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी देशभरातील मोबाईल्सवर आपत्कालीन अलर्ट देण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचीही घोषणा केली. आज अनेक मोबाईलवर अलर्टचे मेसेज आले. यासंदर्भात यापूर्वीच असा प्रयोग करण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली होती. आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की, संपूर्ण शुद्ध, भारतीय मेक अशा पद्धतीने ही अलर्ट सिस्टिम तयार झाली आहे. युद्ध, आपत्ती व आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेत आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे. त्याचे टेस्टिंग आज करण्यात आले. हे टेस्टिंग यशस्वी झाले आहे.
आपण सर्वांनी पाहिले की, आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर एक अलर्ट आला. मेसेज आला. सगळ्या भाषांमध्ये आला. त्यामुळे मला असे वाटते की, भारताने डिजास्टर प्रिपेडनेसमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जी तयारी असायला हवी त्यात अतिशय उत्तम प्रकारची कामगिरी केली आहे, असे फडणवीस म्हणाले.

