पुणे- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधातील बदनामीच्या खटल्याची सुनावणी पुणे येथील विशेष एमपी/एमएलए न्यायालयात विशेष न्यायाधीश अमोल श्रीराम शिंदे यांच्या समोर चालू आहे. या प्रकरणात फिर्यादी सात्यकी सावरकर यांचा उलट तपास राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार हे घेत आहेत.उलट तपासा दरम्यान फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मान्य केले की, विनायक दामोदर सावरकर हे महात्मा गांधी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होते, मात्र नंतर ते निर्दोष सुटले. तसेच सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे पाच वेळा ‘दया याचना’ अर्ज केल्याचेही त्यांनी मान्य केले.
उलट तपासामध्ये सावरकरांच्या विचारसरणी विषयी विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. द्विराष्ट्रवाद, ‘गाय ही देवता नसून उपयुक्त पशू आहे’ असे गायी विषयी सावरकरांनी केलेले भाष्य, तसेच “गांधी ही श्रद्धा तर सावरकर ही अंधश्रद्धा”, “कोण हा सावरकर”, “स्वातंत्र्यवीर सावरकर की स्वातंत्र्यविरोधी सावरकर” अशा विविध टीका ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केल्याचे निदर्शनास आणण्यात आले.
त्याच प्रमाणे ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी सावरकर इंग्रजांसाठी सैन्य भरती करत असल्याची टीका केल्याचा संदर्भही देण्यात आला. तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी “सावरकरांनी इंग्रजांची चाकरी केली, आता मोदी अमेरिकेची करत आहे” अशा आशयाची टीका केल्याचे माहिती नसल्याचे फिर्यादींनी सांगितले.
तसेच माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सावरकरांनी तत्कालीन परिस्थितीत सरदार पटेल यांच्या विरोधात चिथावणीखोर भूमिका घेतल्याचा उल्लेख केल्याचे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणावरही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नसल्याचे फिर्यादींनी न्यायालयात मान्य केले.
उलट तपासा दरम्यान सावरकर कुटुंबीयांनी स्वतः कधीही सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केलेली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र इतर काही विशिष्ट विचारधारेवर चालणार्या संघटनांनी अशी मागणी केली असेल, तर त्याबाबत ठोस माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, अशफाक उल्लाखान, उधमसिंग, बटुकेश्वर दत्त आणि इतर क्रांतिकारक यांचेही मोठे योगदान असल्याचे फिर्यादींनी मान्य केले.
तसेच संसदेमध्ये सावरकरांचे तैलचित्र लावण्यात आले असून तो राष्ट्रीय गौरव मानला जातो, असेही त्यांनी सांगितले. मात्र भगतसिंग, उधमसिंग, बटुकेश्वर दत्त किंवा अशफाक उल्ला खान यांना तशा प्रकारचा गौरव का मिळाला नाही, याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले.
अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये कठोर शिक्षा, फाशी किंवा अमानुष छळ सहन करणारे सर्व क्रांतीकारक भारतरत्नास पात्र आहेत का, या प्रश्नावर “सर्व क्रांतीकारकांचा योग्य सन्मान झाला पाहिजे” असे उत्तर फिर्यादींनी दिले.
तसेच “स्वातंत्र्यलढ्यात फाशी जाणे आणि शिक्षेमध्ये सवलत मिळवणे यामध्ये नैतिक फरक आहे का?” असा प्रश्न ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी विचारला असता, “कोणाला फाशी द्यायची आणि कोणाला सवलत द्यायची हा निर्णय ब्रिटिश सरकारचा होता. त्यामुळे नैतिक फरकाबाबत मी काही भाष्य करू शकत नाही,” असे उत्तर फिर्यादींनी दिले.
या खटल्यात ॲड. ज्ञानेश्वरी भानुदास जाधव, ॲड.अजिंक्य भालगरे व ॲड. सुयोग गायकवाड हे मदत करित आहेत.
न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे उलट तपास अपूर्ण राहिला असून पुढील सुनावणी दिनांक २५ मे २०२६ रोजी होणार आहे.
सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे पाच वेळा ‘दया याचना’ अर्ज केल्याचे फिर्यादी सात्यकी यांना मान्य
Date:

