आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट; भक्तांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई/पुणे (दि. २९): संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची वाढती संख्या आणि उपलब्ध सुविधा लक्षात घेता मुक्कामाचे ठिकाण बदलण्याचा विचार सुरू पालखी सोहळा प्रमुखांकडून सुरू असल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, भवानी पेठेतील मुक्कामाची परंपरा कायम ठेवण्याची विनंती केली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा लाखो वारकरी आणि भक्तांच्या श्रद्धेचा उत्सव आहे. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी येण्याची ही परंपरा पुणेकरांसाठी अत्यंत भावनिक आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे ही परंपरा अखंड सुरू राहावी, अशी मागणी आमदार रासने यांनी केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनीही आपले मत मांडले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन व संबंधितांशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच भवानी पेठेतील मुक्कामाबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो.
याबाबत बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले :
“संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, लाखो भाविकांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. भवानी पेठेतील मुक्कामाची परंपरा ही पुणेकरांच्या भावनांशी घट्ट जोडलेली आहे. पालखी सोहळ्याच्या नियोजनात कोणत्याही भाविकांना अडचण येऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. सर्व संबंधितांशी समन्वय साधून परंपरा अबाधित ठेवत सोहळा अधिक सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

