मुंबई-शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला असून सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम करत थेट शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्जही भरला आहे. त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषद उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन अहिर यांचे पक्षात स्वागत केले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “आम्ही कोणतेही तोडकाम करत नाही, जोडकाम करतो,” असे सांगत शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांमागे विकासाचा अजेंडा असल्याचा दावा केला.
‘सहा खासदारांनंतर सचिन अहिरांचा षटकार’
पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले, “नुकतेच सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज सचिन अहिर यांनीही आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक सहा मतदारसंघांमध्ये जाऊन आले आणि त्यांचे सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केले आहे. खरं तर चौकार-षटकार सुरूच राहतील आणि समोरच्यांच्या विकेट्स पडतच राहतील.”
सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, “सचिन अहिर हे माजी राज्यमंत्री आहेत. गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी मोठे काम केले आहे. विविध कामगार संघटनांमध्ये त्यांनी नेतृत्व केले. मुंबईतील भूमिपुत्र, कोळीवाडे आणि स्थानिकांच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. ते ग्रासरूट स्तरावर काम करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनाने शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.”
एकनाथ शिंदे म्हणाले, सचिन अहिर यांनी आज विधानसभा उपसभापती पदाचा फॉर्म भरला आहे, महायुतीचा फॉर्म भरला आहे. महायुती आज बहुमतात आहेत. त्यामुळे ते उपसभापती म्हणून उद्या त्यांची निवड होईल आणि ते फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रात उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील. ते आल्यामुळे शिवसेनेची देखील ताकद वाढली आहे. कामगार क्षेत्र असेल, मुंबई असेल पुणे असेल, त्यांनी जिथे काम केले आहे तिथे ताकद वाढेल.
हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि या पक्षात त्यांनी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. 2022 ला देखील बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचा विचार पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता, 30 जून 2022 रोजी मी शपथ घेतली होती आणि आजही 30 जून आहे, हा योगायोग आहे. सुरुवातील मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही टीम म्हणून काम केले. पायाभूत सुविधांचा विकास केला. महाराष्ट्र जीडीपीमध्ये नंबर एक झाला आणि महाराष्ट्र वेगवान गतीने धावू लागला.
आम्ही तोडायला नाही तर शिवसेना जोडायला आलो आहोत
एकनाथ शिंदे म्हणाले, या महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आणि आमची घोडदौड सुरूच आहे. आम्ही शब्दाला किंमत देणारी संघटना आहे. मागच्या आठवड्यात आपण पाहिले की 6 खासदारांनी आपल्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. शेवटी जे आपण का शिवसेनेत येतो हे प्रत्येकाने सांगितले. आपल्याला जनतेला न्याय दिला पाहिजे, ही भावना असते. आम्ही तोडायला नाही तर शिवसेना जोडायला आलो आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींना काय पाहिजे? विकास पाहिजे, त्यांच्या मतदारसंघातील लोकांचा विकास करायचा असतो, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात. परंतु, लोक काय काय बोलत असतात, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे असे म्हणत असतात. मात्र ते काही असो. मी आज सचिन अहिर यांचे मनापासून स्वागत करतो. ते अष्टपैलू आहेत. बॅटिंग बॉलिंग करतात आणि आज तर गूगली टाकली आहे, असेही शिंदे यांनी यावेळी अहिर यांच्या विषयी बोलताना म्हटले.
उद्धव ठाकरेंना टोला: “हे तर पुतना मावशीचे प्रेम!”
अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मवाळ भूमिका घेतल्याच्या चर्चेवर शिंदेंनी सडकून टीका केली.
“हे केवळ मगरीचे अश्रू आणि ‘पुतना मावशीचे प्रेम’ आहे. २०१९ मध्ये देवेंद्रजींनी ५० फोन करूनही ज्यांनी एकही फोन उचलला नाही, ज्यांनी ‘एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन’ अशी भाषा वापरली आणि महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्रजींवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवले, त्यांचे हे प्रेम बेगडी आहे. देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना हे सर्व कळते,” असा थेट हल्लाबोल शिंदेंनी केला.
आणखी आमदार येणार? शिंदेंनी राखला सस्पेन्स
ठाकरे गटाचे आणखी कोणते आमदार संपर्कात आहेत का? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स कायम ठेवला. “आजच सगळं सांगितलं, तर उद्याची ब्रेकिंग न्यूज काय असेल? थोडी वाट पाहा, विकेट धडाधड पडत राहतील,” असा इशारा त्यांनी दिला. आम्ही तोडकाम करत नसून जोडकाम करत आहोत, असेही ते म्हणाले.
नीलम गोऱ्हे यांची नाराजी नाही
विशेष म्हणजे, उपसभापती पदासाठी ज्यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती, त्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यादेखील या पत्रकार परिषदेला हजर होत्या. ‘सचिन अहिर यांना उमेदवारी दिल्याबद्दल आपली कोणतीही नाराजी नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केल्याने शिंदे गटातील संभाव्य अंतर्गत नाराजीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.
सचिन अहिर काय म्हणाले?
सचिन अहिर बोलताना म्हणाले, मी आदरणीय एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. जेव्हा कोळशातून हिऱ्याची चमक दिसते आणि तो हिरा जवळ करण्याची संधी येते त्यातूनच विश्व घडवण्याचे काम करत असतो त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बहुमान देऊन मला उपसभापती पदावर नेऊन बसवले आहे. बाळासाहेब ठाकरे असतील, दिघे साहेब असतील यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी काम सुरू ठेवले आहे.
पुढे बोलताना सचिन अहिर म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मला मिळाली आहे. आतापर्यंत जे उपसभापती होते, त्यांची गरिमा वाढवण्याचे काम मी करण्याचा प्रयत्न करेल. तसेच शिवसेना पक्ष म्हणून कसा वाढवता येईल, यावर मी काम करेल.
मला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक राजकीय प्रश्न आहेत, पण त्यावर वेगळ्या व्यसपीठावार बोलता येईल. टीका होईल, ते ठीक आहे. त्यावर वेगळ्या ठिकाणी मी बोलेल. शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे, ती निभावण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, असे अहिर यांनी म्हटले आहे.
आपल्याकडे लोक येतात तेव्हा आपण स्वार्थाचा विचार करत नाही आणि जाताना स्वार्थाचा विचार करता, हे योग्य नसल्याचे सचिन अहिर यांनी म्हटले आहे. उद्धव साहेब असतील किंवा आदित्य साहेब असतील मी त्यांनी दिलेली जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडली आहे. माझे काय योगदान आहे, हे त्या त्या मतदारसंघातल्या लोकांना माहीत आहे.

