मुंबई-लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. सकाळी 11 ते रात्री 7 वाजेपर्यंत सुमारे सहा तास 48 जागावाटपावर चर्चा पार पडली. तर 30 जानेवारी रोजी पुन्हा मविआची बैठक होणार आहे. ही बैठक संपताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी एकजूट आहे. आमच्यात कोणताही वाद नाही. सुमारे सहा तास अतिशय व्यवस्थित 48 जागांवर आमची चर्चा पार पडली आहे. तर आगामी 30 जानेवारी रोजी आम्ही पुन्हा एकत्र बसू व सर्व जागांवर मार्ग काढला जाईल, त्यामुळे विरोधकांनी कितीही देव पाण्यात ठेवले तरी आम्ही मात्र एकजुटीने लढू, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
जी भूमिका आमची आहे, तीच भूमिका प्रकाश आंबेडकर यांची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी आहे आणि असेल. त्यामुळे येत्या काळात वंचित देखील जागावाटपात 30 जानेवारीला सहभागी होतील, योग्य तो पक्षांना न्याय मिळेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
48 जागावर चर्चा झाली आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक घटकपक्ष आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. राजू शेट्टी यांच्याशी देखील व्यवस्थित चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांचा देखील विषय लवकरच मार्गी लागेल. प्रत्येक जागा मविआची आहे. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या फॉर्म्युल्यावर आम्ही जाणार नाही. कारण 48 जागांवर आम्हाला जिंकायचे आहे, असा निर्धार आम्हा महाविकास आघाडीचा आहे. दिल्लीच्या नेत्यांशी देखील आमची चर्चा झाली. सीपीआय, सीपीएम यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. असेही संजय राऊत म्हणाले.