मुंतशीर,अक्षरा, स्वाती,संजोली यांच्यासह मान्यवर कलाकारांचा सहभाग
मुंबई दिनांक २४ जानेवारी २०२४
मुंबई भाजपा उपाध्यक्ष, माजी मंत्री अमरजीत मिश्रा यांच्या ‘अभियान ‘ सामाजिक-सांस्कृतिक संस्थेच्या वतीने उत्तर प्रदेश दिन सांताक्रुज येथील लायन्स क्लब मैदानावर उत्साहात साजरा करण्यात आला. हिंदी चित्रपट पटकथा लेखक-गीतकार मनोज मुंतशीर, भोजपुरी चित्रपट अभिनेत्री-गायिका अक्षरा सिंग यांच्यासह मान्यवर कलाकार उपस्थित होते.
गेली ३५ वर्षांपासून मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांच्या अभियान या संस्थेतर्फे सामाजिक, सांस्कृतिक आयोजन केले जाते. कार्यक्रमात मनोज मुंतशीर यांनी प्रभू श्रीरामाच्या महिमाचे गुणगान करून कार्यक्रमाला नवी उंची मिळवून दिली. मिथिलेची कन्या स्वाती मिश्रा हिच्या “मेरी झोपडी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे” या गाण्याचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले होते. गायिका स्वाती मिश्रा यांनी मंचावरून हे गीत सादर करत उपस्थितांना डोलायला लावले. यावेळी प्रेक्षकांनी जल्लोष करत या गीताला प्रतिसाद दिला. भोजपुरी चित्रपट गायिका प्रियंका सिंगने भक्तिसंगीत तसेच भोजपुरी गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
अयोध्येहून आलेल्या लोकगायिका संजोली पांडे यांनी सोहर आणि भोजपुरी लोकगीते गाऊन वातावरण चैतन्यमय केले. संजोली यांनी भगवान रामाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देशाते चैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांनी मोदी आणि योगींची जोडी राम लक्ष्मण असल्याचे म्हटले. कार्यक्रमात संजोली यांना पंडित हरिराम द्विवेदी स्मृती लोकभाषा सन्मान देवून महामंत्री संजय उपाध्याय यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अभियानातर्फे महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. शितलाप्रसाद दुबे यांनी (उत्तर साहित्यश्री), जैस्वाल समाजाचे प्रमुख माताप्रसाद गुप्ता (उत्तर उद्योगश्री), माजी नगरसेवक कमलेश यादव (उत्तर समाजश्री), अखिल भारतीय चौरसिया समाज पदाधिकारी प्रमिला चौरसिया (उत्तर शिक्षाश्री) आणि अभिनेत्री अक्षरा सिंग (उत्तर कलाश्री) पुरस्काराने गौरविण्यात आले. कुस्तीपटू नरसिंग यादव, गायिका स्वाती मिश्रा, भोजपुरी चित्रपटातील पार्श्वगायिका प्रियांका सिंग आणि प्रसिद्ध कथाकार वीरेंद्र याज्ञिक यांचाही गौरव करण्यात आला.
सोहळ्याच्या प्रारंभी माजी उपमहापौर अरुण देव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अर्जुन पांडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. अमरजीत मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. तर अनिल कनाजिया यांनी सूत्रसंचालन केले. संतोष दीक्षित यांनी आभार मानले.