माय होम इंडिया चे संस्थापक सुनील देवधर यांचे प्रतिपादन :मएसो सिनियर कॉलेज तर्फे युवा चेतना दिन कार्यक्रम
पुणे : शंभर वर्षांहून अधिक काळापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना प्रेरित करण्यासाठी सामर्थ्य आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले होते. आज सोशल मीडियाच्या जगामध्ये भरकटलेल्या जगातील तरुणाईला योग्य दिशा दाखवण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची गरज आहे, असे मत माय होम इंडिया चे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले.
मएसो सिनियर कॉलेज तर्फे आयोजित युवा चेतना दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुनील देवधर बोलत होते. कॉसमॉस बँकेचे संचालक सचिन आपटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, विजय भालेराव, डॉ राजीव हजिरनीस, डॉ संतोष देशपांडे, डॉ मानसी भाटे, प्राचार्य डॉ रवींद्र वैद्य, डॉ पुनम रावत, डॉ सुरेखा वैद्य यावेळी उपस्थित होते.
सुनील देवधर म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मोठा पगडा होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र केवळ अभ्यासले नाही, तर त्यांच्या विचारांचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला, त्यामुळे स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्याला एक विधायक दिशा मिळाली आणि त्यातून राष्ट्र निर्मितीचे कार्य झाले.
अशाच प्रकारे स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि कार्य आपल्या आयुष्यामध्ये रुजवून स्वतःच्या आयुष्याला विधायक दिशा प्रत्येक तरुणाने दिली पाहिजे. जर देशातील प्रत्येक तरुण हा विधायक काम करून देश सेवेसाठी समर्पित झाला, तर निश्चितच उद्याचा बलशाली भारत आपण निर्माण करू शकतो, असा विश्वास सुनील देवधर यांनी यावेळी व्यक्त केला.
सचिन आपटे म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी ध्यान, शक्ती, सेवा आणि हिंदू संस्कृती यांचे महत्त्व कायम जगाला सांगितले आहे. त्यांच्या या चार सूत्रांचे पालन आजच्या तरुणांनी आपल्या आयुष्यात केले पाहिजे तर आयुष्याला एक शिस्त मिळेल. स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मनामध्ये रुजविले पाहिजे, तरच आपण उद्याचा विकसित भारत घडवू शकू.