पुणे-न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर अखेर आज विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपत्रतेच्या प्रश्नावर आपला निकाल दिला. हा निकाल पक्षपाती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
“आमदार अपात्रतेबाबतचा आजचा निकाल हा अनपेक्षित नाही, मात्र महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारा आहे” अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
“कधीकाळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र अशी आपली ओळख होती. सत्ताधाऱ्यांच्या लालसे मुळे आज फोडाफोडीचा महाराष्ट्र राजकीय कुरघोडीचा महाराष्ट्र राजकीय षडयंत्रांचा महाराष्ट्र अशी आपली ओळख झाली आहे. सत्ता व सत्तेच्या माध्यमातून पैसा यासाठी भारतीय जनता पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो हा संदेश आजच्या निकालाने दिला आहे.
राज्यात हीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात लोकप्रतिनिधींच्याच नव्हे तर लोकांच्याही अधिकाऱ्यांवर गदा येईल ही भावना नागरिकांच्या मनात आहे. म्हणूनच येत्या काळात कलुषित राजकारणाची ही मालिका संपवण्यासाठी नागरिक भाजपला राज्यातून हद्दपार करतील हा विश्वास आहे.” असेही प्रशांत जगताप यांनी सांगितले.