पुणे :
भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) तर्फे ‘चेसिंग द एक्स्पोनेन्शियल’ या विषयावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त दि.१० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता भारती विद्यापीठाच्या एरंडवणे शैक्षणिक संकुलातील अभिजितदादा कदम सभागृहात हे व्याख्यान पार पडले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी, भारती विद्यापीठाचे सहसचिव डॉ.के.डी.जाधव,सहसचिव एम.एस.सगरे,परिक्षा नियंत्रक डॉ.अँथनी रोज उपस्थित होते .आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे,उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक यांनी स्वागत केले.डॉ.उज्ज्वला बेंडाळे, डॉ.आत्माराम पवार, डॉ.विवेक रणखांबे, प्रा.श्रेयस डिंगणकर, डॉ. स्वाती देसाई, प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ.माशेलकर यांनी चेसिंग द एक्स्पोनेन्शियल’ या विषयावर मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन, नव संकल्पना, उद्योजकता या मुद्द्यांवर संवाद साधला. ‘डॉ पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व उभे केले. सर्व विद्यार्थ्यांनी भव्य गोष्टींचा ध्यास घ्यावा. आवडत्या गोष्टीवर लक्ष एकाग्र करावे. शिक्षणातून भवितव्य घडवणे शक्य असल्याने देशाचे स्थान जगात प्रथमस्थानी यावा, यासाठी प्रयत्न करावेत’ , असे त्यांनी सांगितले.
डिजिटल क्रांतीतला कल्याणकारी आशय
भारतानं मोबाईल क्षेत्रात मोठीच क्रांती घडवली. देशात 1995 ते 2014 या 20 वर्षांत 90 कोटी ग्राहकांची भर पडली. ऑनलाईन पेमेंट च्या क्रांतीची भर पडली. लाखो भारतीय व्हॉइस कॉलिंगचा आणि 4 जी इंटरनेटचा स्वस्तात आनंद लुटत आहेत.नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान गरिबांना परवडेल, यावर विश्वास हवाच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गरीब लोक उच्च तंत्रज्ञान आत्मसात करून वापरू शकतात, यावरही विश्वास हवा. ग्राहकाचं पूर्ण समाधान करता यायला हवं. कंपन्यांच्या “संशोधन आणि विकास विभागांनी’ही मनोवृत्तीत बदल करत, साध्या पण उपयुक्त दर्जेदार उत्पादनांची कास धरावी. शिक्षण आणि विज्ञान हातात हात घालून पुढे गेले पाहिजे. त्यातून उद्योजकता विकसित झाली पाहिजे. संधीची दारे स्वतःहून उघडली नाहीत तर नव्या संधी तयार केल्या पाहिजेत.
‘ डॉ. माशेलकर यांचे मार्गदर्शन भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे असून आयुष्यात पुढें नेणारे आहे.देशाच्या प्रगतीत भारती विद्यापीठाचे विद्यार्थी आपले योगदान देत राहतील’, असे उद्गार कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी अध्यक्षीय भाषणात काढले .भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ.विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .