नागपूर –
आमदार अपात्रेतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थीर राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
नेमके काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थीर असून सरकार कालही स्थीर होते आणि उद्याही ते स्थीर राहणार आहे, असा पूर्ण विश्वास मला असल्याचे फडणवीस म्हणाले. निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होईल त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर मालदीव आणि लक्षद्वीप या पर्यटन स्थळांची जोरदार चर्चा होत आहे. मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या फोटोंवर मालदीवच्या मंत्र्यांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने हे प्रकरण चांगलेच पेटले. यादरम्यान आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. फडणवीसांनी हे मालदीव नव्हे म्हणत कोकणातील फोटो शेअर केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी कोकणाला भेट देण्याचे आवाहन केले असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला सिंधुदूर्ग आणि अरबी समुद्रातील वॉटर स्पोर्ट्स अनुभवण्याचा सल्ला देखील दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी ही पोस्ट केली आहे.हे मालदीव नाही! महाराष्ट्राला लाभलेले हे आपले सुंदर कोकण! फोटो सिंधुदुर्गचे आहेत.. जेव्हा तुम्ही #IndianIslands भेट द्याल, तेव्हा कोकणाला भेट द्यायला विसरू नका आणि सिंधुदुर्ग किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्य कौशल्याचे सर्वात मोठे उदाहरण पाहून मंत्रमुग्ध व्हा.