मुंबई-महाराष्ट्रासह देशात यंदा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. मी अजून 8 महिने आहे. तोपर्यंत फिरावे लागणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.
गुरुवारी पालघर जिल्ह्यांतील सरपंच व विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी शिंदे म्हणाले, मी अजून 8 महिने आहे. म्हणून आपल्याला फिरावे लागणार आहे. शिवसेना पक्षात नव्याने दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांचे एकनाथ शिंदेंनी स्वागतही केले.
यावेळी शिंदे म्हणाले, ”आज दोन प्रवेश झाले आहेत वरळी आणि पालघर मधून अनेक जणांनी प्रवेश केला आहे. तुम्ही जो विश्वास दाखवला तो मी पूर्ण करेल. आम्ही राज्यात केलेल्या विकासामुळे विश्वासाने तुम्ही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालघरचा विकास केला जाणार असून जिल्ह्यातील सगळ्यांना नोकरी मिळाली पाहिजे यासाठी काम करतोय असे आश्वासन शिंदेंनी दिले. तसेच मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे. यासाठी आपण वर्सोवा ते विरार आणि विरार ते पालघरपर्यंत रस्ता करणार आहोत, असेही शिंदे म्हणाले.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ”सगळ्यांना रोजगार आणि हाताला काम मिळाले पाहिजे, यासाठी काम करत आहे. अडीच वर्षांत जर काम थांबले होते ते दीड वर्षात पूर्ण करत आहेत. महाराष्ट्रात उद्योग नंबर एकवर करणार आहे. मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम सर्वात लोकप्रिय आहे. 2 कोटी लोकांनी याचा लाभ घेतला आहे”, असे शिंदे म्हणाले.
”यावेळी आम्ही बंड केले त्यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांच्या मुलाचा वाढदिवस होता. पण त्यांनी त्यावेळी ते म्हणाले आधी लग्न कोंढाण्याचे आणि नंतर बाकीचे सगळे… असा प्रसंग मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितला.