शिरूर : शिरूर तालुक्यातील जांबूत भागातील जोरी वस्ती येथे वनविभागाकडून लागण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर बिबट्या जेरबंद झाला आहे. पकडलेली ही बिबट्याची मादी सात ते आठ वर्षे वयाची आहे. बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात करण्यात येणार असल्याची माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.
जांबुत गावात नागरिकांवर हा बिबटया हल्ला करत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण होते. मागील १५ दिवसांपासून वन विभागाने नरभक्षक बिबटयाचा शोध सुरु केला होता. परंतु वन विभागाने पिंजरा लावूनही तो मिळून आला नव्हता. अखेर शनिवारी सकाळी बिबटया पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि: श्वास सोडला आहे.
दहा दिवसांपूर्वी जोरी वस्ती येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला होता.जोरी वस्ती येथे राहणारी पूजा भगवान नरवडे (वय १९) ही १२ ऑक्टोबरला बिबट्याने केलेल्या हल्ल्लात ठार झाली होती. पूजा जोरी वस्तीवर आपल्या घरासमोरील ओट्यावर भांडी घासत असताना दबा धरून बसलेला बिबट्या तेथे आला. तिच्यावर झडप घातली. पूजाने आरडाओरड केल्याने तिची आई यमुना बाहेर आल्या आणि मदतीसाठी धावाधाव केली. काही ग्रामस्थ दांडके हातात घेऊन बिबट्याच्या मागे धावले. मात्र, बिबट्याने पूजाला फरपटत जवळच्या उसाच्या शेतात नेले. या हल्ल्यामध्ये पूजाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या भागात वाढलेला बिबट्याचा वावर तसेच ग्रामस्थ आणि प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.
जांबूत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बिबट्याला पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या भागात १८ पिंजरे आणि २० कॅमेरे लावण्यात आले होते. वनखात्याची गस्तही वाढविण्यात आली होती. गेले दहा दिवस बिबट्या हुलकावणी देत होता. अखेर शनिवारी (२२ ऑक्टोबर) पहाटे जोरी वस्तीवर लावण्यात आलेल्या पिंजरात तो अडकला.