मुंबई दि.१०:- मागील पाच वर्षापेक्षा गेल्या वर्षभरात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली असून शिक्षा होण्याच्या प्रमाणात, दरातही मोठी वाढ झाली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
विधिमंडळात विरोधी पक्षांनी याबाबत चर्चा केली असता त्यास उत्तर देतांना उपरोक्त माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालानुसार राज्याचा गुन्हे सिद्ध होण्याचा दर १३%ने वाढला आहे. आता हा दर ६२% आहे. एवढा शिक्षा होण्याचा दर या आधी कधीच नव्हता. तसेच पोक्सो अंतर्गत गुन्ह्यातही घट आहे.ही घट ३२०० ने आहे. महत्वाचे म्हणजे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातही ९५९ ने घट झालेली आहे. त्याचबरोबर दंगे, चोरी, फसवणूक,अपहरण या गुन्ह्यातही राज्यात घट झालेली आहे.
देशाच्या तुलनेत आपण पाहिले तर असे लक्षात येईल की, बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये आपल्या राज्याचा क्रमांक २२ आहे. खूनाच्या गुन्ह्यात २५ वा,महिलावरील गुन्ह्यांमध्ये १३ वा आहे.
एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्था मागील काळापेक्षा चांगली आहे. सन २०१९ मध्ये दाखल गुन्ह्यांची व सन २०२० मध्ये दाखल गुन्ह्यांची तुलना केली असता लक्षात येते. असे श्री. देशमुख यांनी सांगितले.