पुणे : “महाराष्ट्रीयन गृहिणी शिळ्या अन्नावर प्रक्रिया करून पुन्हा ते खाण्यास वापरतात. परंतु सध्या पारंपरिक जीवनशैली लुप्त पावत आहे. त्यामुळे फास्ट फूड, कॉस्मेटिक, युज अँड थ्रो अश्या वस्तूंचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, टाकाऊ पदार्थांचे पुनर्वापर कमी होतो आहे. दैनंदिन जीवनात अनेक घटकांचा वापर आपण करत असतो. त्यातील सर्वच घटकांचा पुनर्वापर शक्य आहे. त्यामुळे टाकाऊ पदार्थांचा अधिकाधिक पुनर्वापर व्हायला हवा,” असे प्रतिपादन मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आणि पर्यावरण अभियंता राजेंद्रकुमार सराफ यांनी केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) पुणे स्थानिक केंद्र यांच्या संयुक्त विदयमाने ‘अभियांत्रिकीतील नोकरी-व्यवसायाच्या संधी’ व्याख्यानमालेतील दुसऱ्या सत्रात ‘टाकाऊ पदार्थांपासून मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते, त्यावेळी ते बोलत होते. जंगली महाराज रस्त्यावरील दि इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी उपाध्यक्ष डॉ. नीलिमा राजुरकर, विनय र.र., अविनाश निघोजकार आदी उपस्थित होते.
राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, “उपलब्ध संसाधनाचा कमीत कमी वापर करणे हा भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग होता. परंतु तो आता नामशेष झाला आहे. पूर्वी अनेक गोष्टींचा पुन्हा पुन्हा वापर केला जात होता, त्यामुळे पर्यावरण संतुलन देखील राहत होते. आपल्या अवतीभवती अनेक घटक आहेत, ज्यांचा वापर करून नवीन व्यवसाय करता येऊ शकतो. त्यामध्ये टाकाऊ निर्माल्यपासून विविध प्रकारच्या अगरबत्ती, मानवी विष्ठेपासून सोनखत, पाण्याचा पुनर्वापर, अंड्याच्या छिलक्यापासुन प्रसाधने आणि औषधे आदी घटक आहेत. सूत्रसंचालन डॉ. नीलिमा राजुरकर यांनी केले. आभार अविनाश निघोजकार यांनी केले.