पुणे : समाजात सध्या अस्थिरता पाहायला मिळत आहे. कोणालाही सुरक्षित वाटत नाही. गुन्हेगारी, हिंसा वाढत आहे. अशावेळी समाजाला एका आधाराची आवश्यकता आहे, ते काम गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते करत आहेत. कोणाला अडचण आल्यास कार्यकर्ते हे त्यांच्या मदतीस धावून जातात. अस्थिर झालेल्या समाजात कार्यकर्ते लोकांचा आधार ठरत आहेत. असे मत खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
पुणे परिवाराच्या वतीने गणेश सेवा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हाॅलमध्ये करण्यात आले होते. यावेळी लोकमान्य जीवन गौरव पुरस्कार, आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्कार आणि गणेश सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, डाॅ. मिलिंद भोई, पुणे परिवारचे अध्यक्ष ॲड.प्रताप परदेशी, कार्याध्यक्ष शिरीष मोहिते, विनायक घाटे उपस्थित होते. सन्मान चिन्ह पुणेरी पगडी शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा १७ वे वर्ष आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त माणिकराव चव्हाण हे यंदाच्या लोकमान्य जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले. पोलीस शांतता कमिटीचे शेख मोहम्मद मुन्तखबुद्धीन यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला. पुणे गणेश फेस्टिवल परिवार यांना गणेश सेवा पुरस्काराने तर धीरज घाटे, आनंद सागरे, प्रीतम शिंदे, प्रल्हाद थोरात, रफिक शेख, निलेश पवार यांना आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गिरीश बापट म्हणाले, आपल्या परिसरात कोणालाही अडचण आली तर गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी भावासारखे धावून त्यांना मदत केली पाहिजे. दुसऱ्यांचे समजून घेण्याची भूमिका घेत एक आदर्श कार्यकर्ता जनतेचा आधार कसा बनेल हे बघा. गणेशोत्सव मंडळाचा लोकांना आधार वाटला पाहिजे असे सांगत दारू मुक्त गणेशोत्सव कसा होईल याकडे गणेशोत्सव कार्यकर्त्यांसह पोलिसांनीही लक्ष द्यायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
अमिताभ गुप्ता म्हणाले, गणेशोत्सवात काहीही चांगले किंवा वाईट झाले तरीही त्याची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे सगळे पोलीस उत्सवाच्या दरम्यान झोकून काम करतील. गणेशोत्सव सुरळीत आणि सोईचा कसा होईल याकडे आम्ही लक्ष देऊ असेही त्यांनी सांगितले. गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यंदाचा उत्सव यशस्वीपणे पार पाडू.
प्रताप परदेशी म्हणाले, गणेशोत्सव कार्यकर्त्यांचे काम मोठे आहे. गणेशोत्सव कार्यकर्ते रिकामटेकडे आहेत, असे म्हटले जाते, परंतु करोना मध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी काम केले आहे. गणेशोत्सव कार्यकर्त्यांची आस्था, भक्ती त्यांचा त्याग आणि सामाजिक कार्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. विनायक घाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश ढमढेरे यांनी आभार मानले.